कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी
By admin | Published: September 25, 2016 01:52 AM2016-09-25T01:52:29+5:302016-09-25T01:52:29+5:30
शहरातील हनुमान वार्ड, राजेंद्र वार्ड व कस्तुरबा वार्डातील कुटुंबधारकांना मागील २० ते ३० वर्षापूर्वी
देसाईगंज : शहरातील हनुमान वार्ड, राजेंद्र वार्ड व कस्तुरबा वार्डातील कुटुंबधारकांना मागील २० ते ३० वर्षापूर्वी बसविलेल्या जुन्याच वीज जनित्रावरून विद्युत पुरवठा सुरू होता. परिणामी क्षमता कमी झालेल्या सदर वीज जनित्रावरून गेल्या अनेक वर्षांपासून या वार्डातील नागरिकांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत होता. या संदर्भात तक्रारी केल्यानंतर महावितरणच्या येथील अधिकाऱ्यांनी तिन्ही वार्डातील नव्या वीज जनित्राचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या वार्डात आता पुरेसा वीज पुरवठा होणार आहे. आठवडाभरात येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी सदर प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.
कमी वीज दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. या संदर्भात लोकमतने तब्बल दोनदा वृत्त प्रकाशित करून या समस्येला वाचा फोडली होती. सदर वृत्ताची दखल घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हनुमान वार्ड, शिवाजी वार्ड, कस्तुरबा वार्डात सर्वेक्षण करून येथे नव्या वीज जनित्रासाठी जागेचा शोध सुरू केला. त्यानंतर नवे वीज पोल उभारण्यासाठी कस्तुरबा वार्ड, शिवाजी वार्ड, हनुमान वार्ड येथे १०० केव्हीचे तीन विद्युत जनित्र लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शहरी भागातील आंतर वीज जोडणी सुरू करण्यात आली असून सदर तिन्ही विद्युत जनित्र जोडणीचे काम आठवडाभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे कमी वीज दाबाच्या त्रासापासून नागरिक पूर्णत: मुक्त होणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)