रस्त्यांना चिखलाचा विळखा
By admin | Published: July 29, 2014 11:48 PM2014-07-29T23:48:33+5:302014-07-29T23:48:33+5:30
मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली. अनेक ठिकाणी गाळही साचला. मात्र ग्रा. पं. वेलगूर परिसरातील ग्रा. पं. किष्ठापूर अंतर्गत येणाऱ्या चार
वेलगूर : मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली. अनेक ठिकाणी गाळही साचला. मात्र ग्रा. पं. वेलगूर परिसरातील ग्रा. पं. किष्ठापूर अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच गावातील अंतर्गत रस्त्यांना चिखलाने विळखा घातल्याने सर्वत्र घाण पसरली आहे. मात्र ग्रा. पं. प्रशासनाच्यावतीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करण्यात आली. परंतु बहुतांश ठिकाणचा गाळ उचलण्यात आला नाही. नाल्यातील गाळाची विल्हेवाट लावण्याच्या कामाकडे ग्रा. पं. प्रशासनाने सर्रासपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला उपसलेला नाल्यांचा गाळ पावसाने डांबरी व सिमेंट रस्त्यावर पसरला. परिणामी रस्त्यावर चिखल निर्माण झाल्याने नागरिकांना ये-जा करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने नाल्यातील उपसलेल्या गाळाची विल्हेवाट न लावण्यात आल्याने गावात घाण पसरली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामपंचायत वेलगूर येथे चार सफाई कामगार काम करीत आहेत. परंतु कामगारांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते आपल्या कामात दिरंगाई करीत आहेत, असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे. नवेगाव येथील मुख्य रस्ता ते तुकाराम झोडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. चिखलामुळे रोगराई पसरण्याची शक्यताही नागरिकांनी वर्तविली आहे. ग्रामपंचायत वेलगूर व किष्ठापूर येथील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावात घाण पसरली आहे. त्यामुळे नाल्यांचा उपसा केलेला गाळ ग्रा. पं. प्रशासनाने त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला गावात मुरूम टाकण्याचे काम ग्रा. पं. ने का केले नाही, असा सवालही नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)