अनेक पांदण रस्ते अतिक्रमणात सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:25 AM2021-06-26T04:25:23+5:302021-06-26T04:25:23+5:30

वैरागड : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले ...

Several paved roads were found in the encroachment | अनेक पांदण रस्ते अतिक्रमणात सापडले

अनेक पांदण रस्ते अतिक्रमणात सापडले

Next

वैरागड : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. या पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.

धूम्रपानाने आजारात झाली वाढ

आष्टी : आहाराच्या बदलत्या सवयी, अमलीपदार्थांचे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. अनेक जणांना आजाराची लागण होत आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी वाढत आहे.

अतिक्रमण वाढले

गडचिरोली : शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सौर नळ योजना कुचकामी

एटापल्ली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावात विजेची सुविधा नाही तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र अनेक योजनांमध्ये बिघाड आल्याने त्या बंद आहेत.

बंधारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष

झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पकालावधीतच बंधारा फुटला आहे.

मालेवाडा समस्याग्रस्त

कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्यसेवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा.

मोबाइल सेवा सुधारण्याची मागणी

सिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या टेकडाताला परिसरातील बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेच्या अभावामुळे या भागातील लोकांना तेलंगणा राज्याच्या नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे टेकडाताला येथे बीएसएनएलच्या फोर-जी सेवेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भ्रमणध्वनीधारकांनी केली आहे.

मातीकाम झाले, मात्र खडीकरणाची प्रतीक्षा

अहेरी : तालुक्यातील खांदला ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथून आवागमन करणे कठीण होत आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरून गोलाकर्जी गावापासून २० किमी अंतरावर चिरेपल्ली गाव आहे. गावात ५०० ते ६०० लोकसंख्या आहे. सदर मार्ग गोलाकर्जी-रायगट्टा-राजाराम-खांदला-पत्तीगाव-बोगागुडमवरून चिरेपल्लीकडे येतो. येथून परिसरातील नागरिक नेहमीच आवागमन करतात. तालुका मुख्यालयातील विविध कामांकरिता ये-जा करीत असतात; परंतु रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणचा रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने येथे मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर खांदलापासून चिरेपल्लीपर्यंत तीन ते चार नाले आहेत. या नाल्यावर पुलाचे बांधकाम न झाल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

संरक्षक कठड्यांविना किन्हाळ्याचा पूल

माेहटाेला/किन्हाळा : किन्हाळा ते फरीदरम्यान गाढवी नदीवर अनेक वर्षांपासून पूल आहे. परंतु, या पुलावर अद्यापही संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. बांधकामापासूनच येथे संरक्षक कठडे नाहीत. सध्या या मार्गावरील रहदारी वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. किन्हाळालगतच्या पुलावर संरक्षक कठडे लावण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्षच केले जात आहे. नदी अथवा पुलाचे बांधकाम करताना अंदाजपत्रकात संरक्षक कठड्यासह अन्य खर्च नमूद असताे. परंतु, ह्या बाबीकडे कंत्राटदार गंभीरतेने लक्ष देत नाहीत. किन्हाळा व अरततोंडी हे गाव पुनर्वसित होण्यापूर्वी मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, रिठ चिखली, विहीरगाव ह्या गावांचा बैलबंडी व पादचारी मार्ग हा कोकडी गावावरून गाढवी नदी पार करून देसाईगंज या ठिकाणी यावे लागत असे.

नसबंदीअभावी वाढली माेकाट कुत्र्यांची संख्या

गडचिराेली : माेकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले असले तरी गडचिराेली नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे माेकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांच्या कळपामुळे गडचिराेलीवासीय त्रस्त आहेत. गडचिराेली शहरात माेकाट जनावरे, कुत्रे व डुकरांची समस्या अतिशय गंभीर आहे. गडचिराेली नगर परिषदेमार्फत अधूनमधून डुकरे पकडण्याची माेहीम राबविली जाते. तरीही डुकरांची संख्या वाढतच चालली आहे. डुकरांच्या समस्येने ग्रस्त नसलेला एकही वाॅर्ड नाही. डुकरांबराेबरच कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. रात्री भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेकांची झाेपमाेड हाेत आहे. कुत्र्यांची संख्या वाढत असल्यास त्यांची नसबंदी करण्याचे अधिकार नगरपरिषदेला दिले आहेत. मात्र गडचिराेली नगरपरिषदेच्या इतिहासात एकदाही नसबंदीची प्रक्रिया राबविली नाही. परिणामी माेकाट कुत्रे वाढत चालले आहेत.

विद्युत खांबांमुळे रहदारीस अडथळा

आष्टी : येथील काही वाॅर्डात अंतर्गत रस्त्यांवर मधाेमध विद्युत खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धाेका बळावला आहे. भविष्यात येथे गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरील खांब हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गावातील अंतर्गत रस्त्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. दुचाकी व चारचाकी वाहने ये-जा करीत असतात; परंतु मधाेमध असलेल्या खांबांमुळे अडथळा निर्माण हाेत आहे. आधीच येथील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. येथील रस्त्यावरून वाहनांची माेठ्या प्रमाणात रहदारी असते. काही ठिकाणच्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे, तर काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका बसत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून विद्युत खांब हटवावेत, अशी मागणी आहे.

पातागुडम-काेर्ला मार्गाची दैन्यावस्था कायम

सिराेंचा : तालुक्यातील शेवटच्या टाेकावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पातागुडम परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पातागुडम-काेर्ला या मार्गाची माेठ्या प्रमाणात स्थिती दयनीय आहे. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पातागुडम व काेर्ला ही गावे अतिशय संवेदनशील भागात आहेत. जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त भागात आधीच हा परिसर अविकसित आहे. त्यातच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रहदारीस अडथळा येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टाेकावरील इंद्रावती नदीच्या टाेकावर पातागुडम हे गाव आहे. पातागुडम-काेर्ला या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची दुरुस्ती झाल्यास पातागुडम, रायगुडम, पेंडलाया, साेमनपल्ली, काेप्पेला आदी गावांसह छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरू शकते. काेर्लासमाेरून देचलीपेठा ते जिमलगट्टा दरम्यान, नाल्यावर पुलाचे बांधकाम झाल्याने देचलीपेठा व काेर्ला तसेच जिमलगट्टामार्गे बारमाही जाेडले आहेत. पातागुडमजवळील इंद्रावती नदीवर पूल बांधल्याने येथून वाहनांची वर्दळ पहावयास मिळते.

आरमाेरी शहरातील वाढीव वस्ती दुर्लक्षित

आरमाेरी : नगरपंचायतीचे नगरपरिषदेेमध्ये रूपांतर झाल्यानंतरही आरमाेरी शहरात शहरवासीयांच्या अपेक्षेेप्रमाणे विकासाची गंगा दिसून येत नाही. विकासकामात गती नसून वाढीव वस्ती तसेच शहरापासून दूरवर असलेला परिसर अद्यापही दुर्लक्षित आहे. काळागाेटा परिसरासह वाढीव वस्तीत रस्ते, नाल्या, छाेटे पूल, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर मूलभूत समस्या अजूनही कायम आहेत. नगरपरिषद प्रशासनाने शहराचा समताेल विकास साधावा, ज्या ठिकाणी रस्ते, नाल्यांची गरज आहे. शहरवासीयांच्या मागणीनुसार प्रशासनाने विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून हाेत आहे. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे द्या

कुरखेडा : तालुक्यातील काही अतिक्रमणधारकांना वनहक्काचे पट्टे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, गावातील इतर अतिक्रमणधारकांना अद्यापही वनहक्क पट्टे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना शासनाच्या या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात वनहक्क समित्यांकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु, अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही संबंधिताना वनहक्क पट्टे मिळालेले नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जमिनीचे पट्टे द्यावेत, अशी मागणी होत आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.

रस्त्यांवर बांधकाम साहित्य; कारवाई करा

काेरची : शहरातील विविध भागात घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावरच ठेवले जात आहे. लोखंडी सळाखी तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नगरपंचायतीकडून अशा नागरिकांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्यामुळे बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातही अरुंद रस्ते असतानासुद्धा या ठिकाणी रेती, विटा, गिट्टी आदी साहित्य ठेवले जातात. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार वाढत आहेत.

Web Title: Several paved roads were found in the encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.