लोकसभेत शरद पवार, उध्दव ठाकरेंकडे पाहून जनतेचा कौल मिळाला, असं नाही : राज ठाकरे

By संजय तिपाले | Published: August 22, 2024 06:50 PM2024-08-22T18:50:16+5:302024-08-22T18:51:23+5:30

राज ठाकरेंची कोपरखळी: उमेदवारी देताना आयारामांपेक्षा निष्ठावंतांनाच प्राधान्य

Sharad Pawar and Uddhav Thackeray in the Lok Sabha did not get the people's approval | लोकसभेत शरद पवार, उध्दव ठाकरेंकडे पाहून जनतेचा कौल मिळाला, असं नाही : राज ठाकरे

Sharad Pawar and Uddhav Thackeray in the Lok Sabha did not get the people's approval : Raj Thakarey

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यांना पाहून लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं असं नाही, तर भाजपविरोधी वातावरणाचा फायदा त्यांना झाला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोपरखळी मारली. नवनिर्माण यात्रेनिमित्त २२ ऑगस्टला ते जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी माध्यमांसमोर अनेक खुलासे केले.

राज ठाकरे यांचे शहरात दुपारी १२ वाजता आगमन झाले. इंदिरा गांधी चौकात त्यांचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर ते चंद्रपूर रोडवरील शासकीय विश्रामगृहात पोहोचले. यावेळी तिन्ही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी एकत्रित संवाद साधला. पुत्र अमित ठाकरे, मनसे नेते अनिल शिदोरे, प्रवक्ते व पक्ष निरीक्षक गजानन काळे, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

यानंतर माध्यमांनी अनौपचारिक चर्चेत त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीय व मुस्लीम मतदान महाविकास आघाडीकडे गेले, पण प्रत्येक निवडणुकीची गोष्ट वेगळी असते, त्यामुळे विधानसभेलाही असेच चित्र राहील, असे नाही.

आपण स्वत: निवडणूक लढवणार का या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असे उत्तर दिले. आगामी विधानसभा निडणूकीत कुणाला कौल मिळेल हे आताच सांगता येत नाही,पण राजकीय परिस्थिती आणि पक्षांची एवढी सरमिसळ झाली आहे की मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. इतर पक्षातील बंडखोर आमच्याकडे आल्यास थेट उमेदवारी देणार नाही. आधी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ नंतर आलेल्यांचा विचार करू, असे सांगून त्यांनी आयारामांनाही सूचक इशारा दिला. विधानसभा निवडणुकीत विदर्भातील बहुतांश जागा लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत उमेदवार देताना केवळ लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटविणार
जिल्ह्यात मनसेचा तितका प्रभाव नाही. कधी आंदोलन नाही की कुठल्या प्रश्नावर पदाधिकारी बाजू मांडत नाही. संघटनात्मक ताकदही दिसत नाही, याविषयी राज ठाकरे यांनी सांगितले की, नवनिर्माण यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गडचिरोलीत
आधी नेहमी येणे व्हायचे, आता खूप वर्षांनी आलो आहे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटवून नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

अद्याप कोणी संपर्कात नाही
भाजपमध्ये उमेदवारीसाठी भाऊगर्दी आहे. त्यामुळे कोणी संपर्कात आहे का, यावर राज ठाकरे यांनी अद्याप कोणी संपर्कात नाही, असा खुलासा केला. गडचिरोलीत किती जागांवर उमेदवार देणार, हे अद्याप ठरवले नाही, असेही त्यांनी सांगितले.

आदिवासी नृत्याने भारावले राज ठाकरे
शासकीय विश्रामगृह परिसरात आगमन झाले तेव्हा स्वागतासाठी आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी जीपमधून उतरून राज ठाकरे हे थेट पारंपरिक आदिवासी वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांकडे गेले व त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचा पोशाख व वाद्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी कलावंतांच्या आग्रहास्तवर त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढला.

Web Title: Sharad Pawar and Uddhav Thackeray in the Lok Sabha did not get the people's approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.