रेगडी येथे बँंक शाखा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:36 AM2021-04-25T04:36:11+5:302021-04-25T04:36:11+5:30

घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी ...

Start a bank branch at Regadi | रेगडी येथे बँंक शाखा सुरू करा

रेगडी येथे बँंक शाखा सुरू करा

Next

घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे, शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.

अनेक वार्डातील नाल्यांची दुरवस्था

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत, शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.

मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी

धानोरा : तालुक्यातील मोहली बीएसएनएलचा मनोरा आहे, परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्मशानभूमींची दुरवस्था वाढली

कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताही नाही.

मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी

झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.

भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा

चामोर्शी : तालुक्यातील भीवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी.

पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसुती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार

गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.

नागमाता मंदिराजवळ गतिरोधक निर्माण करा

आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

कुरखेडातील अंतर्गत नाल्या तुंबल्या

कुरखेडा : शहरातील नाल्यांचा प्रशासनाच्या वतीने अनेक दिवसांपासून नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टीक व इतर कचरा साचला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत.

कोडसेपल्लीतील समस्या साेडवा

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी, जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा

सिरोंचा : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे, परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने, बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक नागरिक बीपीएलपासून वंचित आहेत.

कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढवा

धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा सदर मार्ग बंद राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

लखमापूर बोरीत गतिरोधकाचा अभाव

लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथील बस स्थानक परिसरातील शिवाजी चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. चामोर्शी-आष्टी मार्गावर लखमापूर बोरीतील सदर शिवाजी चौक असल्याने येथे गतिरोधकाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, जेणेकरून अपघाताला आळा बसेल.

तालुक्यात अनियमित वीजपुरवठा

देसाईगंज : तालुक्यातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील कुरूड, कोंढाळा, मोहटोला, किन्हाळा आदी कृषिपंपधारक शेतकरी आहेत. सध्या धान पीक जोमात आहे. या शेतकऱ्यांना अनेकदा शेतीला पाणी द्यावे लागते. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

अमली पदार्थांच्या सेवनाने आजार वाढले

आष्टी : आहाराच्या बदलत्या सवयी, अमली पदार्थाचे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. अनेक जणांना आजाराची लागण होत आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी वाढत आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी कारवाई होत नाही. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर कारवाईची मागणी होत आहे.

सिकलसेल रुग्णांना मोफत बस प्रवास द्या

वैरागड : शासनाने सिकलसेलग्रस्तांच्या मोफत प्रवास सवलतीसाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मोफत बसप्रवास सवलत लागू करावी. सिकलसेलग्रस्त नागरिक शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत.

Web Title: Start a bank branch at Regadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.