जलयुक्त शिवारची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:10 AM2019-01-31T01:10:54+5:302019-01-31T01:11:27+5:30

जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावून सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यात आली. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या उदासीनतेमुळे गतवर्षी व चालू वर्षाची मिळून ६९१ कामे अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत.

Water Works | जलयुक्त शिवारची कामे रखडली

जलयुक्त शिवारची कामे रखडली

googlenewsNext
ठळक मुद्देदिरंगाईचा कळस : दोन वर्षांची मिळून ६९१ कामे अपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावून सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यात आली. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या उदासीनतेमुळे गतवर्षी व चालू वर्षाची मिळून ६९१ कामे अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत.
सन २०१८-१९ या चालू वर्षात जिल्ह्यातील एकूण १७२ गावांची निवड करून या गावांमध्ये एकूण ४ हजार ५१९ कामे मंजूर आराखड्यानुसार प्रस्तावित करण्यात आली. यापैकी ४ हजार २३८ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. १ हजार ५८२ कामांची निविदा कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून १७२ पैकी १७ गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली आहे. २८५ कामे पूर्ण झाले असून या कामांवर २०५.८९ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. चालू वर्षातील तब्बल ३०० कामे अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत. यामध्ये कृषी विभागाच्या अखत्यारित असलेले १४३, मनरेगा अंतर्गत ६७, वनविभागाचे ८३ व जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या सात कामांचा समावेश आहे.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या कामावर विविध यंत्रणेमार्फत एकूण ४६५.५४ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. अपूर्ण स्थितीत असलेल्या कामांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३५, धानोरा ७४, देसाईगंज १२, आरमोरी ५०, कुरखेडा ६, कोरची २६, चामोर्शी २१, मुलचेरा १४, अहेरी १८, भामरागड ३, सिरोंचा ६ व एटापल्ली तालुक्यातील ३५ कामांचा समावेश आहे. चालू वर्षात गडचिरोली तालुक्यात २१, धानोरा १५७, आरमोरी ३०, कुरखेडा ५, कोरची २३, चामोर्शी ४, मुलचेरा ११, अहेरी २१ व एटापल्ली १३ अशी एकूण २८५ कामे पूर्ण झाली आहेत.
कृषी व वनविभागाची गती कमी
गतवर्षी २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामासाठी १२२ गावांची निवड करण्यात आली. आराखड्यानुसार ३ हजार ७०३ कामे मंजूर करण्यात आली. प्रशासकीय मान्यताप्राप्त ३ हजार ६७९ कामांपैकी केवळ २ हजार ९१५ इतकी कामे पूर्ण करण्यात आली. गतवर्षीची ३९१ कामे अद्यापही अपूर्ण आहेत. यामध्ये कृषी विभागाचे सर्वाधिक २५० व वनविभागाच्या ७८ कामांचा समावेश आहे. हे दोन विभाग माघारले आहेत.

Web Title: Water Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.