गोव्यात भाजपा-मगो युती दुभंगण्याची शक्यता; एकमेकांच्या मतदारसंघात नेते सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 08:44 IST2025-03-22T08:43:09+5:302025-03-22T08:44:29+5:30
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २७ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर भाजप आणि मगो संघर्ष तीव्र होईल व मग युती दुभंगण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते.

गोव्यात भाजपा-मगो युती दुभंगण्याची शक्यता; एकमेकांच्या मतदारसंघात नेते सक्रिय
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप आणि मगो हे दोन्ही पक्ष सत्तेत असले तरी, दोन्ही पक्ष आतापासूनच एकमेकांच्या मतदारसंघात जास्त सक्रिय झाल्याने संभाव्य उमेदवारांचे कार्यकर्ते चलबिचल झाले आहेत. जे मतदारसंघ मगो पक्षाकडे नाहीत, तिथे मगोपचे नेते जाऊन काम करत आहेत व जिथे मगोपचे आमदार आहेत, तिथे भाजप नेते सक्रिय झाले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांमधील काही कार्यकर्तेही गोंधळले आहेत. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर हा संघर्ष तीव्र होईल व मग युती दुभंगण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही भाजप-मगो अशी युती नकोच होती. त्यांनी त्यावेळी आक्षेप घेतला होता, पण देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी गोव्यात भाजपचे निवडणूक प्रभारी होते. त्यांनी आणि मंत्री विश्वजीत राणे यांनी त्यावेळी ढवळीकर यांच्यासोबत खूप बैठका घेऊन युतीसाठी प्रयत्न केले होते. पण मगोपने तेव्हा तृणमूल काँग्रेससोबत युती केली. मग निवडणूक निकाल लागल्यानंतर गृहमंत्री अमित शाह, फडणवीस व विश्वजीत यांच्यामुळेच सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद मिळाले.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री सावंत यांनी मांद्रे मतदारसंघात जाऊन हा मतदारसंघ भाजपच लढवणार, असे जाहीर केले. यामुळे नव्याने संघर्ष सुरू झाला आहे. सुदिन ढवळीकर यांनी मांद्रे हा मगोपचा पारंपरिक मतदारसंघ असा दावा केला. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना दोष दिलेला नाही. तथापि, कार्यकर्त्यांना बरेच काही कळून आले आहे. जीत आरोलकर हे मगोपचे आमदार असले तरी, त्यांना ढवळीकर यांच्यापासून दूर करून भाजपच्या जवळ आणण्यात मुख्यमंत्री सावंत हे यशस्वी ठरू लागले आहेत. मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी चार दिवसांपूर्वीच प्रियोळ मतदारसंघात जाऊन महिला मेळावा घेतला व आपण प्रियोळमधून निवडणूक लढवीनच, असे जाहीर केले आहे. यामुळे मंत्री गोविंद गावडे यांचे समर्थक आश्चर्यचकित झाले आहेत.
२७ जागांवर विजय मिळवणे हेच भाजपचे लक्ष्य : दामू नाईक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, सर्व चाळीसही मतदारसंघांमध्ये पक्ष संघटन वाढवणे ही माझी जबाबदारी आहे. पक्ष वाढवण्यासाठी जे काही करायला हवे ते करण्याचे पूर्ण अधिकार प्रदेशाध्यक्ष या नात्याने मला आहेत. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २७ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे व त्या दृष्टिकोनातून आमचे काम सुरू आहे. सरकारमध्ये घटक असलेल्या मगोपकडे आमचे चांगले संबंध आहेत. ते पुढेही चालूच ठेवू, परंतु आमच्या पक्षाचे नुकसान करून नव्हे. २०२७ मध्ये युती असावी की नाही याचा निर्णय केंद्रीय नेते घेतील. त्यावेळी प्लस-मायनस काय ते होईल. परंतु आम्ही त्यांच्या मतदारसंघात कामच करू नये, असे म्हणता येणार नाही.
युतीत काही जणांनी मुद्दामहून राजकारण आणले : ढवळीकर
युतीमध्ये काहीजणांनी मुद्दामहून राजकारण आणले आहे. केंद्रीय नेतृत्वाला आम्ही भाजपसोबत राहणार, अशी ग्वाही त्यावेळी दिलेली आहे. २०२७ मध्ये जर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी वेगळा विचार केला तर मग आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागेल. पक्ष म्हणून प्रत्येक मतदारसंघात काम करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रियोळमध्ये माझे मतदार आहेत, तिथे मी परवा महिला मेळावा घेतला. मांद्रेतही तिथेही मेळावा घेऊ. मांद्रेचे आमचे आमदार जीत आरोलकर यांना विश्वासात घेऊनच मांद्रेबद्दल पुढील निर्णय घेतला जाईल, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.