पणजीच्या राजरस्त्याचे वैभव हरपले...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 07:54 AM2023-11-18T07:54:35+5:302023-11-18T07:55:26+5:30

मागील वीस वर्षांत नेमके काय बदलले आहे हे सांगायचे झाल्यास बांदोडकर मार्गावरील अशा तीन-चार मोक्याच्या स्थळांचा उल्लेख करावा लागेल.

glory of panaji royal road is lost in smart city work | पणजीच्या राजरस्त्याचे वैभव हरपले...!

पणजीच्या राजरस्त्याचे वैभव हरपले...!

- वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

पणजीशी माझी ओळख तशी गोवा मुक्ती आधीपासूनची म्हणजे साधारण ६४-६५ वर्षांची. पोर्तुगीज काळातील पणजी आणि आज चारही बाजूने विस्तारत गेलेले पणजी शहर, यात अर्थातच जमीन अस्मानाचा फरक. काळानुसार बदलत गेलेल्या आणि अजूनही पणजीत होत असलेल्या बऱ्या वाईट बदलाचा मीही एक साक्षीदार. मागील तीन-चार दशकांत तर पणजीचा एकूणच चेहरा बराच बदलत गेला आणि सिमेंट काँक्रिटची जंगलेही वाढत गेली. तीन-चार दशकांपूर्वीची पणजी आताशा दिसत नाही. पणजी खऱ्या अर्थाने म्हातारी झाली, असे गमतीने म्हटले जात असले तरी राजधानीच्या शहराची आज झालेली अवस्था पाहता 'पणजी' आपले लोभसवाणे वैभव हरवून बसलीय, हे नक्की.

पणजी स्मार्ट होतेय असे आपण मागील अनेक वर्षे ऐकतोय, माझ्यासारखा प्रत्येक जण आमची पणजी कधी स्मार्ट होईल याची प्रतीक्षा करत असला तरी स्मार्ट होण्यासाठी पणजीला अशाही अग्निदिव्यातून जावे लागणार आहे, याची मात्र कोणीही कल्पना केली नव्हती. खरोखरच स्मार्ट सिटीचा झगा चढवून घेण्यासाठी झालेली पणजीची अवस्था पाहता सरकारला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि स्मार्ट सिटीचे ग्रहण मागे लावून घेतले, असे अनेकांना वाटते. सध्या पणजीचे लोभसवाणे वैभव हरवून बसलो आहोत, हे नक्की.

पणजी शहरातील राजमार्गाचा विचार करता ही बाब प्रामुख्याने लक्षात येते. वीसेक वर्षांपूर्वीचा दयानंद बांदोडकर मार्ग आजही नजरेसमोरून हटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हटत नाही. येत्या दोन दिवसांत भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गोव्यातील विसावा अध्याय सुरू होत असल्याने या राजमार्गाचे गतवैभव नव्याने डोळ्यांसमोर येत असावे आणि आज जे प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते त्याच्याशी तेव्हाच्या वैभवाची तुलना करण्याचा मोह अनावर होत असेलही, पण पणजीच्या राजरस्त्याचे वैभव आम्ही गमावून बसलो आहोत हे सत्य नाकारता येणार नाही. पहिल्या इफ्फीवेळी म्हणजे २००४ मध्ये ज्यांनी ज्यांनी या रस्त्याचे मनोहारी' रूप प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले असेल त्यांना निदान आजचे या राजरस्त्याचे ओंगळवाणे रूप पाहिल्यानंतर ही तुलना निश्चितच अप्रस्तुत वाटणार नाही. वर्षांत मांडवी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि राजधानी पणजीची एकूणच रया गेली आहे. पाटो पुलापासून मिरामार सर्कलपर्यंत रात्रीची सहज जरी चक्कर मारली तरी कोणाच्याही नजरेतून हा बदल सुटणार नाही याची खात्री आहे.

मागील वीस वर्षांत नेमके काय बदलले आहे हे सांगायचे झाल्यास बांदोडकर मार्गावरील अशा तीन-चार मोक्याच्या स्थळांचा उल्लेख करावा लागेल. पणजीच्या राजरस्त्याची ही सौंदर्यस्थळे होती. या रस्यावर पोर्तुगीज काळापासून दिमाखात उभे असलेले आयकॉनिक हॉटेल मांडवी आणि या हॉटेलसमोरचा नेहमीच गजबजलेला असायचा तो प्रोमिनाद, हॉटेल मांडवी काही वर्षांपासून बंद आहे. ते बंद पडण्याची कारणे वेगळीच असतील, सरकारशी त्याचे काही सोयरसुतक नसले तरी मांडवी किनाऱ्याच्या माळेतील हे हॉटेल म्हणजे एक लखलखता हिरा होता, हे कोणीही मान्य करेल. सायंकाळच्या वेळी आमच्यासारखे अनेकजण तिथे जातात तेव्हा तेथील भकास वातावरण बघून मनाने जुन्या काळात कधी जाऊन पोचतो, हे कळतही नाही.

गोव्याची कला अकादमी म्हणजे गोमंतकीय कलेचे माहेरघर. मागील तीनेक वर्षे नूतनीकरणाच्या गोंडस नावाखाली कला अकादमी बंद राहिली. या काळात पणजीकर या वास्तूकडे एक भूतबंगला म्हणूनच पाहात होते. कायम गजबजाट असलेला हा परिसर तब्बल तीन वर्षे बंद राहिल्यानंतर त्याकडे पाहण्याची लोकांची नजर बदलली तर त्यांना दोष देता येणार नाही. पन्नासेक कोटी खर्चून नूतनीकरण केलेल्या या वास्तूचे नुकतेच उद्घाटन झाले असले तरी तो नेहमीचा गजबजाट दिसण्यासाठी अजून काही काळ थांबावे लागणार आहे. आवश्यक तंत्रज्ञान सुविधांचा अभाव असल्याने इफ्फीतील चित्रपटांचे प्रदर्शन करण्यास इफ्फीच्या तांत्रिक समितीने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे यंदाच्या इफ्फीतही हा परिसर ओकाबोकाच दिसणार आहे. राजरस्त्यावर कला अकादमीच्या रूपातील आणखी एक सौंदर्यस्थळ अजून काही काळ अंधारातच राहील असे दिसते. मिरामारच्या दिशेने पुढे जाताना डावीकडे फुटबॉल स्टेडियम गेली दोन-तीन वर्षांपासून उभे राहत आहे, तर उजवीकडेही सगळा आनंदी आनंदच आहे. आता इफ्फीच्या काळात ईएसजीचा परिसर काही दिवस थोड़ा लख्ख उजेडात न्हाऊन निघणार असला तरी मांडवी नदीत नांगर टाकून असलेले मोठमोठाले कसिनो हेच काय ते दुर्दैवाने पणजीच्या राजरस्त्याचे वैभव बनून राहिले आहेत.

पणजी गेली आठ-नऊ वर्षे स्मार्ट सिटीच्या अग्निदिव्यातून जात आहे. बेळगाव हुबळी या शहरांचे स्मार्ट सिटी योजनेखाली झालेले रूपांतर ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले असेल त्यांना पणजीचे काम का रखडले आहे, हे समजण्यापलीकडचे आहे. स्मार्ट सिटीच्या कामात कधीच पारदर्शकता नव्हती, ती दिसण्याची शक्यताही नाही. आठशे-साडेआठशे कोटी खर्च होणार आहेत इतकेच आम्ही जाणतो. पणजी आणि पणजीवासीयांनाही अजून किती काळ या अग्निदिव्यातून जावे लागणार आहे, याची कल्पना नाही. निदान पणजीच्या राजरस्त्याचे हरपलेले वैभव तरी परत मिळायला हवे याबद्दल दुमत नसावे.
 

Web Title: glory of panaji royal road is lost in smart city work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.