सरकार भक्कम, सभापती बदलू; जुलैमध्ये अधिवेशन - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:50 IST2019-05-24T19:50:20+5:302019-05-24T19:50:38+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.

सरकार भक्कम, सभापती बदलू; जुलैमध्ये अधिवेशन - मुख्यमंत्री
पणजी : आपल्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर आणि भक्कम आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. विधानसभेचे अधिवेशन येत्या जुलै महिन्यात घेतले जाईल. नव्या सभापतींचीही निवड करण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपने विधानसभेच्या चारपैकी तीन जागा जिंकल्या. आम्हाला यासाठी मंत्री गोविंद गावडे यांनी विशेष मदत केली. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. शिवाय भाजपप्रणीत आघाडीचे अन्य घटक व आमचे अन्य सहकारीही भाजपसाठी वावरले. सर्वाचाच हातभार लागला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आता मंत्र्यांना अतिरिक्त खाती देणार काय असे पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की थोडा वेळ लागेल. विधानसभा अधिवेशन दि. 31 जुलैर्पयत आम्हाला घ्यावे लागेल. आघाडीच्या घटक पक्षांशी बोलून तारीख नंतर ठरवू पण जुलैमध्ये अधिवेशन होईल. भाजपच्या यशानंतर घटक पक्षाच्या सर्व मंत्री, आमदारांनी, अपक्षांनी आपल्याला फोन केला व आपले अभिनंदन केले.
पणजी मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने उत्पल र्पीकर यांनी आता पणजीत भाजपच्या कामात जास्त सहभागी व्हावे असे वाटते काय असे पत्रकारांनी विचारले असता, तेंडुलकर म्हणाले की तो निर्णय उत्पलनेच घ्यावा. पक्षाला जी भूमिका घ्यायची असेल ती भूमिका पक्षाकडून चर्चेअंती घेतली जाईल.
तो निर्णय सुदिनवरच
दरम्यान, मगो पक्षाने अजून सरकारचा पाठींबा मागे घेणारे पत्र राज्यपालांना दिलेले नाही, त्याविषयी काय वाटते असे पत्रकारांनी विचारताच मुख्यमंत्री म्हणाले की त्याविषयीचा काय तो निर्णय सुदिन ढवळीकर यांनीच घ्यावा. ज्याने पाठींबा दिला होता, तोच पाठींबा मागे घ्यावा की घेऊ नये हे ठरवू शकतो. मगोपचा पाठींबा आमच्या सरकारला फक्त कागदावरच आहे.