नरकासुर की गोंगाटासुर? सरकारी यंत्रणा, धर्मज्ञानी असभ्य संस्कृती रोखण्याचे धाडस करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2024 09:17 AM2024-10-20T09:17:59+5:302024-10-20T09:19:28+5:30

सरकारी यंत्रणा, धर्म संस्कृती शिकवणारे धर्मज्ञानी या फोफावणाऱ्या असभ्य संस्कृतीला आळा घालण्याचे धाडस करतील का? ज्या वाईट प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी दिवाळी प्रसिद्ध आहे ते विसरून, वाईट प्रवृत्तीच वाढवण्यासाठी दरवर्षी दिवाळी साजरी केली जाणार आहे का?

narakasur and increasing the rude culture in goa | नरकासुर की गोंगाटासुर? सरकारी यंत्रणा, धर्मज्ञानी असभ्य संस्कृती रोखण्याचे धाडस करणार का?

नरकासुर की गोंगाटासुर? सरकारी यंत्रणा, धर्मज्ञानी असभ्य संस्कृती रोखण्याचे धाडस करणार का?

प्रासंगिक, राजमोहन शेट्ये, कोरगाव

दिवाळी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळीत रोषणाईला फार महत्त्व आहे. गोडधोड फराळ करण्याची आणि खाण्याची मोठी प्रथा आहे. एक उत्साहाचा व विजयोत्सवाचा सण म्हणून हा सण ओळखला जातो. गोव्यात दिवाळीनिमित्त नरकासुर या बलाढ्य राक्षसाच्या प्रतिमा करून त्याचे दहन करणे ही फार मोठी परंपरा मानली जाते. अगदी ग्रामीण ते शहरी भागातसुद्धा ते तयार करण्यात गुंतलेली तरुण मुलं वाड्यावाड्यांत दिसून येतात. नरकासुराच्या महाकाय प्रतिकृती गल्लोगल्ली आकाराला येताना दिसू लागल्या आहेत.

पूर्वी हे नरकासुर साधारण गावातील वाड्यापुरतेच मर्यादित होते, आता मात्र त्यांची व्याप्ती वाढली आहे. पूर्वी अक्राळविक्राळ अशा नरकासुराची ढोल, डबे अशा वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढून, नंतर गावात फिरून आल्यानंतर वेशीवर त्याचे दहन केले जायचे. आता गल्लोगल्ली तयार झालेले नरकासुर, गल्लीच्या तिठ्यावर मधोमध दहन केले जातात आणि अनेक दिवस त्यांचे अवशेष तसेच पडून असतात. पुढे यामुळे अपघात होऊन अनेक जण जीवसुद्धा गमावतात. मात्र या अपघाताचे परिणाम तसे कुणावरच कधी झालेले आढळून येत नाही. एका रात्रीची हौस आणि मौजेतून कुणा निष्पापाचा बळी गेला, याचा विचार करायला आज सामान्य माणसाजवळ संवेदना तरी कुठे राहिल्या आहेत? मग कोणी आणि कशासाठी, का म्हणून रडावे?

पूर्वी वाड्यातील पोरं नरकासुर गावात फिरवून आणून सकाळच्या प्रहरी दहन करायचे. घरी पहाटे अंघोळ व्हायची आणि मग विविध प्रकारच्या चवदार पोह्यांवर ताव मारायचे. तो संपूर्ण दिवस कुटुंबासोबत घालवला जायचा. अशी आनंदी दिवाळी साजरी व्हायची. हल्ली अनेक रात्री जागून नरकासुराच्या निमित्ताने मौजमजा करणारी तरुण मंडळी, सकाळी लवकर उठणार कशी? त्यामुळे ते दुपारी उठतील तेव्हा त्यांची दिवाळी साजरी होते. त्यांना आज याबद्दल कुणी एक चकार शब्दसुद्धा बोलू शकत नाही. त्याहीपुढे त्यांच्यासाठी थांबायला आज वेळ तरी कुठे आहे! आपली अगदी दयनीय अशी स्थिती या नरकासुराच्या परंपरेमुळे झाली आहे. वाईट प्रवृत्तीचा नाश करायचा या भावनेने अडगळीचे, नसो असलेले सामान वापरून तयार होणारा लहानसा नरकासुर गावाच्या वेशीवर जाळून, मग घरी आनंदोत्सव साजरा करायचो. आता त्याची व्याख्याच बदलून त्याच्या क्क्रूर प्रवृत्ती नकळत घरी घेऊन यायला लागलो आहोत. याचा परिणाम आज समाजव्यवस्थेवर होताना दिसत आहे. अपप्रवृत्तींच्या गोष्टी दिवसेंदिवस समाजव्यवस्था बिघडवताना दिसतात. घरोघरी एक अस्वस्थता यामुळे वाढत चालली आहे.

पूर्वी नरकासुराचे स्वरूपच वेगळे होते. भात कापणी झालेल्या तणातून नरकासुरांच्या प्रतिमा तयार व्हायच्या. त्यात कागद, पालापाचोळा, जुने कापड, लाकूड असे हाती सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरून तो तयार प्रवृत्तीचा नाश करायचा या भावनेने अडगळीचे, नसो असलेले सामान वापरून तयार होणारा लहानसा नरकासुर गावाच्या वेशीवर जाळून, मग घरी आनंदोत्सव साजरा करायचो. आता त्याची व्याख्याच बदलून त्याच्या क्रूर प्रवृत्ती नकळत घरी घेऊन यायला लागलो आहोत, याचा परिणाम आज व्हायचा. कामे आटपून रात्री हे काम नित्यनेमाने दहा ते पंधरा दिवस अगोदर सुरू व्हायचे आणि एकंदर हसत खेळत एकत्र येऊन नरकासुराच्या प्रतिमा तयार व्हायच्या. यात जर एखादा खिश्चनवाडा हिंदूवाड्यात मिसळलेला असला तर, हिंदू-ख्रिश्चन व एखादा मुस्लीम तरुणसुद्धा त्यात सहभागी व्हायचा. जात धर्मापलीकडील सण होता तो. जास्तीत जास्त नरकचतुर्दशी दिवशी एक लाउड स्पीकर सोबत असायचा. तो पण तिथल्या तिथेच आवाज करणारा. 

आज या नरकासुराचे स्वरूपच बदलले आहे. जाल तिकडे स्पर्धा भरवल्या जातात. स्पर्धेत टिकण्यासाठी यात आणखी किती क्रूरता येईल, याकडे प्रतिमा तयार करणाऱ्यांचे लक्ष असते. त्याच्या अमाप अशा विकृतीचा शोध घेण्याचे काम तरुण पिढी करीत असते. त्यामुळे हा क्रूर व निर्दयी अक्राळविक्राळ राक्षस दरवर्षी नवीन क्रूरता घेऊन जन्मास येतो. आज त्याची व्याप्ती एवढी वाढली आहे की, त्याच्या हालचालींना वेग आला आहे. अनेक तंत्रांच्या साहाय्याने तो आकर्षक बनवला जात आहे. डीजेशिवाय तो राहू शकत नाही. यासाठी मग वर्गणी गोळा करण्याची नवीन पद्धतही सुरू झाली आहे. त्याही पुढे गावातील पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य ते आमदार, मंत्री हे सुद्धा आता नरकासुर पुरस्कर्ते झालेले आहेत. त्यामुळे नरकासुराला पैशांचे वजन आले आहे. 

आज तो पैसा गोळा करण्याचे साधन झाला आहे. ज्या भागात तो बनवला जातो तिथे बंधनकारक अशी वर्गणी घेतली जाते आणि रात्रीचे डीजेचे कर्कश्य संगीत. मनात नसले तरी, ऐकण्याची तयारी ठेवावीच लागते. डीजे इतक्या जोरात वाजत असतात की आवाजाने हृदयाची धडधडही वाढते.. पण त्यावर एक चकार शब्द बोलण्याची हिंमत कुणी दाखवत नाहीत. कारण यात वावरणारी पोरं तिथल्याच राजकीय मंडळींचे कार्यकर्ते असतात. यामुळे आजचा नरकासुर सामान्यांसाठी डोक्याला ताप झाला आहे. या नरकासुरावर आता कुणाचेच बंधन, नियंत्रण राहिलेले नाही. ना तो तयार करणाऱ्या पोरांचे, ना त्या भागात राहणाऱ्या रहिवाशांचे. गोंगाट सहन करण्यापलीकडे सामान्यांच्या हातात काही नसते. यामुळे वाईट प्रवृत्तीचा नाश सोडा, वाईट प्रवृत्तीचा नरकासुरच दिवसेंदिवस प्रत्येकाच्या तनामनात रुजताना दिसत आहे. नरकासुर ही वाईट प्रवृत्ती नामशेष होण्याची आज गरज आहे. त्याहीपेक्षा नरकासुराच्या नावाखाली नवीन पिढी व्यसनाधीन होताना दिसत आहे. 

शहरी भागातील गोंगाटाचे आंधळे अनुकरण गावात केले जात आहे. आज देशी पर्यटक हा असला गोंगाट पाहण्यासाठी आणि दारूची आतषबाजी करण्यासाठी गोव्यात यायला लागले आहेत. तर विदेशी पर्यटक या गोंगाटामुळे नको तो गोवा म्हणताना दिसत आहेत. हे सर्व अनुभवताना, कुठे नेऊन ठेवलाय माझा पवित्र शांत गोवा असे वाटते. पवित्र अशा गोमंतभूमीची एक नवीन प्रतिमा तयार केली जात आहे. याची खरंच कुणालाही खंत वाटत नाही का? आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी शांत शीतल गोव्याचं आणि परंपरागत साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचं स्वरूप राजकीय वरदहस्ताच्या बळावर बदललं जात आहे. याची जाणीव आपल्या राज्यकर्त्यांनाच कोणीतरी करून देण्याची गरज आहे.

नरकासुराच्या निमित्ताने होणारी पैशाची उधळण, दारूचा पुरवठा आणि डीजेचा कर्णकर्कश गोंगाट सगळेच विकृत रूप दिसायला लागले आहे. गोमंतकीयांची पुढची पिढी यात नाहक भरडली जात आहे. कर्कश संगीत प्रदूषण नियंत्रण मंडळ नियंत्रित करू शकते, दारूच्या आतषबाजीवर अबकारी खाते लक्ष ठेवू शकते, रस्त्यारस्त्यावर होणारा धिंगाणा आणि धांगडधिंगा पोलिस अधिकारी रोखू शकतात. नियम आणि कायदे काटेकोरपणे अमलात आणले तर या सर्व गोष्टींवर नियंत्रण येऊ शकते. सरकारी यंत्रणा, धर्म संस्कृती शिकवणारे धर्मज्ञानी या फोफावणाऱ्या असभ्य संस्कृतीला आळा घालण्याचे धाडस करतील का? ज्या वाईट प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी दिवाळी प्रसिद्ध आहे ते विसरून, वाईट प्रवृत्तीच वाढवण्यासाठी दरवर्षी दिवाळी साजरी केली जाणार आहे का? यासाठी राजकीय इच्छाशक्ती जागृत होणे आवश्यक आहे. कर्कश गोंगाटाचे समर्थन करण्याऐवजी, निषेध नोंदवणारा खरा गोमंतकीय आज जागा होण्याची खरी गरज आहे.
 

Web Title: narakasur and increasing the rude culture in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.