मंत्र्यांमधील 'बेशिस्ती'ची दखल; सदानंद तानावडे यांनी डोळे वटारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2024 12:09 PM2024-09-19T12:09:34+5:302024-09-19T12:14:03+5:30

माविन गुदिन्हो व अन्य मंत्र्यांशी बोलणार

notice of discipline among ministers in bjp goa | मंत्र्यांमधील 'बेशिस्ती'ची दखल; सदानंद तानावडे यांनी डोळे वटारले

मंत्र्यांमधील 'बेशिस्ती'ची दखल; सदानंद तानावडे यांनी डोळे वटारले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वाढत्या रस्ते अपघातांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरुन मुख्यमंत्र्याकडे असलेल्या बांधकाम खात्यावर माविन गुदिन्हो यांनी निशाणा साधल्याने भाजपने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. दुसऱ्याकडील खात्याचा दोष काढून एखाद्या मंत्र्याने भाष्य करणे योग्य नव्हे. मी माविन गुदिन्हो यांच्यासह इतर मंत्र्यांविषयी बोलणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.

बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंत्र्यांमध्ये एकमेकांच्या खात्यांविषयी उणीदुणी काढण्याचे प्रकार वाढले आहेत, याकडे लक्ष वेधले असता तानावडे म्हणाले की, जे कोणी मंत्री असे दुसऱ्याच्या खात्यांबद्दल बोलतात त्यांना तसे करू नये असे मी सांगणार आहे. माविन यांना आज, गुरुवारीच भेटणार आहे. रस्ता अपघातात तीन दिवसात सात बळी गेल्याने वाहतुकमंत्र्यांनी अपघातांना बांधकाम खात्याचे अभियंते जबाबदार आहेत, असे विधान करुन अभियंते काय काम करतात?, असा संतप्त सवाल केला होता. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने पक्षानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे.

मध्यंतरी आमदार मायकल लोबो यांनी स्वतः सत्तेत असूनही एका मंत्र्याच्या खात्याबद्दल असेच विधान केले होते. अन्य काही मंत्रीही अनेकदा एकमेकांच्या खात्यांची उणीदुणी काढत असतात त्यामुळे सरकारची प्रतिमा खालावते, अशी पक्षनेतृत्त्वाची भावना बनली आहे. मंत्रिमंडळ फेररचेनेबद्दल विचारले असता तानावडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पक्षाला अजून काही कल्पना दिलेली नाही. फेरबदल करायचे किंवा नाही व करायचे तर ते आता की पितृपक्ष संपल्यानंतर हे मुख्यमंत्रीच ठरवतील. सध्या तरी मुख्यमंत्री यासंबंधी पक्षाकडे काहीही बोललेले नाही.

'भुतानी'ला परवाने काँग्रेसच्या काळात

सध्या राज्यभर गाजत असलेल्या व ठिकठिकाणी निदर्शने होत असलेल्या सांकवाळ येथे डोंगरफोड करुन येऊ घातलेल्या मेगा प्रकल्पाबद्दल विचारले असता तानावडे म्हणाले की, या जमिनीला २००७ साली काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना सनद मिळाली व २००९ साली पर्यावरणीय परवाने दिले गेल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. आमच्याकडे संपूर्ण माहिती हातात आल्यानंतर दोन दिवसात या विषयावर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन भाष्य करीन.

कोअर कमिटीची बैठक

दरम्यान, पक्षाची सदस्यता मोहीम सध्या सुरु आहे. किती टार्गेट आहे, असे विचारले असता तानावडे म्हणाले की, आम्ही कोणालाही टार्गेट दिलेले नाही. सध्या राज्यात आमचे ३ लाख ३० हजार सदस्य आहेत. किमान वर्षे वय असावे एवढीच अट आहे. त्याचबरोबर आज कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात सदस्यता मोहीमेसह मंत्र्यांच्या बेशिस्तीच्या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दर मंगळवारी मंत्री कार्यकर्त्यांना भेटणार

सरकारमधील सर्व मंत्री आता दर मंगळवारी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी स्वतःपासून याची सुरवात केली. येथील भाजप मुख्यालयात ते कार्यकर्त्यांना भेटले व त्यांच्या समस्या, अडचणी तसेच सरकार दरबारी असलेली कामे जाणून घेतली. तानावडे यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आमचा प्रयत्न होता की मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना आठवड्यातून किमान एकदा तरी भेटावे. मंत्रालयात लोक भेटतच असतात परंतु कार्यकर्त्याला जर भेटायचे असेच तर मंत्री पक्षाच्या कार्यालयात उपलब्ध व्हावा या हेतूने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे.

जमिनी विकू नयेत

भूतानीच्या बाबतीत तानावडे म्हणाले की, गोमंतकीयांनी परप्रांतीयांना जमिनी विकल्या नसत्या तर हा प्रश्न उपस्थित झालाच नसता. या प्रकल्पाला दिलेल्या मंजुरीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. गोमंतकीयांनी परप्रांतीयांना जमिनी विकू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

'भुतानी' वादात सिक्वेरांची उडी

सांकवाळ येथे भुतानी कंपनीच्या मेगा प्रकल्पाला २००८ साली 'जीसीझेडएम'ने पर्यावरणीय परवाने दिल्याचे सिध्द करा, असे खुले आव्हान मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिले आहे. सिक्वेरा हे त्यावेळी काँग्रेसच्या दिगंबर कामत सरकारमध्ये मंत्री होते. सिक्वेरा हे २००८ साली पर्यावरणमंत्री असताना या प्रकल्पाला ईसी दिल्या गेल्याचा जो आरोप होत आहे. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, त्यावेळी या प्रकल्पाला कोणतेही परवाने किंवा ना हरकत दाखले दिलेले नाहीत. जे कोणी आरोप करत आहेत त्यांनी ते मला आणून दाखवावेत, असे आव्हान दिले.

 

Web Title: notice of discipline among ministers in bjp goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.