सावकारांचे १ हजार ६२९ प्रस्ताव निबंधकांकडे
By admin | Published: July 5, 2015 02:05 AM2015-07-05T02:05:07+5:302015-07-05T02:05:07+5:30
सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे.
संख्या वाढणार : सर्वाधिक प्रस्ताव अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून
गोंदिया : शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने सावकारांकडून येत्या ३० जून पर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातून एकूण १६२९ प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रस्तावांत आणखी वाढ होणार असून आजघडीला सर्वाधिक प्रस्ताव अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दिसून येत आहेत.
खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील प्रमुख कारण असल्याचे विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात मोडत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी किंवा त्यांच्या कुंटुबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर या योजनेंतर्गत परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सावकारांनी त्यांच्या तालुकास्थळावर सहायक निबंधकांकडे १६२९ प्रस्ताव सादर केले आहेत. यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातून सर्वाधिक ६९९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. गोंदिया तालुक्यातून फक्त चार प्रस्ताव प्राप्त झाल्याचे नमूद आहे. या शिवाय तिरोडा तालुक्यातून ३७१, सडक-अर्जुनी तालुक्यातून ५५५ प्रस्ताव आले आहेत. (शहर प्रतिनिधी)
आणखी प्रस्ताव येणार
सध्या तरी जिल्हा उपनिबंधकांकडे १६२९ प्रस्ताव असले तरी त्यांची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती आहे. यात देवरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येणार आहेत. शिवाय अन्य तालुक्यातूनही थोड्याफार प्रमाणात प्रस्ताव वाढणार असल्याची माहिती आहे.
कर्जमाफीसाठी ३.६० कोटी मिळाले
शासनाकडून शेतकऱ्याचे कर्जमाफी करण्यासाठी अर्थात प्रस्ताव सादर करणाऱ्या देण्यासाठी शासनाकडून निबंधकांच्या खात्यात ३.६० कोटी रूपये टाकण्यात आले आहेत. निबंधकांकडे असलेले १६२९ प्रस्तावएक कोटी ८० लाख ३७ हजार १२३ रूपयांचे आहेत. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांची एवढी रक्कम माफ केली जाणार असल्याचे समजते. मात्र त्यानंतरी निबंधकांच्या खात्यात रक्कम शिल्लक राहणार असल्याने पुढे येणारे प्रस्तावही माफ होतील.
प्रस्ताव काढणार निकाली
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका त्यानंतर त्यांचे निकाल आल्याने शासकीय यंत्रणा त्या कामांत व्यस्त आहे. जिल्हाधिकारीही कामांत व्यस्त असल्याने या प्रकरणाला घेऊन बैठक झालेली नाही. मात्र या आठवड्यांत शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर बैठक होणार असून त्यात बहुतांश प्रस्ताव निकाली काढले जातील असे जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्याकडून कळले.