सामान्यांच्या पोटाला चिमटा
By admin | Published: October 25, 2015 01:45 AM2015-10-25T01:45:59+5:302015-10-25T01:45:59+5:30
महागाई नियंत्रणात येण्याचे नाव घेत नसतानाच या महागाईने त्रस्त सर्वसामान्य लोकांना पोटाला चिमटा घेऊन राहावे लागत आहे.
वाढत्या महागाईने अडचणीत : तांदूळ-गहू साधारण, डाळी आवाक्याबाहेर
गोंदिया : महागाई नियंत्रणात येण्याचे नाव घेत नसतानाच या महागाईने त्रस्त सर्वसामान्य लोकांना पोटाला चिमटा घेऊन राहावे लागत आहे. त्यांना दोन वेळचे जेवणही पोटभर घेणे दुरापास्त झाले आहे. महागाईच्या या काळात तांदूळ-गहू साधारण असले तरिही डाळी मात्र आवाक्याबाहेर झाल्या आहेत. अशात खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला असून त्यांचे बजेट बिघडले आहे. आता दिवाळीचा सण साजरा तरी कसा करायचा असा सवाल सर्वसामान्य करीत आहेत.
महागाईचे चक्र असे फिरत आहे की, चैनीच्या वस्तूंवर दिलासा मिळत असून खान्याच्या वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. एकीकडे धानाला मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तर डाळीचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. सध्याच्या या तेजीच्या बाजारात तांदूळ, गहू व तेलाचे भाव साधारण दिसून येत आहेत. वाढ असली तरिही यात साधारण वाढ होत असल्याने नागरिकांच्या पचणी पडत आहे. तांदळाचे भाव सध्या दोन हजार २०० रूपयांपासून तीन हजार ८०० रूपयांपर्यंत आहेत. यात गहू सुद्धा दोन हजार २०० ते दोन हजार ४०० रूपयांच्या घरात दिसून येत आहे.
डाळीनी मात्र रेकॉर्ड ब्रेक तेजी घेतली आहे. तुरीची डाळ १८ हजारांच्या घरात पोहचली असून उडदाची डाळ १६ हजार रूपयांची घरात आहे. अशा या परिस्थितीत ग्राहकच काय तर व्यापाऱ्यांनाही फटका बसत असून डाळींची खरेदी करणारा ग्राहकच नसल्याचे धान्य विक्रेता संजय अमृते सांगतात. धान्यांच्या त्यातही डाळींच्या या सध्याच्या भावाकडे बघता सर्वसामान्यांचे दोन वेळचे जेवणच हिरावल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. महागाईच्या या कचाट्यात सर्वसामान्यांनी दिवाळी साजरी कशी करायची असा सवाल जनता करीत आहे. (शहर प्रतिनिधी)