कृषी कार्यालयाला पाटबंधारे विभागाचे कुलूप
By Admin | Published: August 17, 2015 01:45 AM2015-08-17T01:45:28+5:302015-08-17T01:45:28+5:30
सिहोरा स्थित असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असले तरी, या वसाहतीला पाटबंधारे विभागाने कुलूप ठोकले आहे.
कार्यालयाचे स्थानांतरण वांद्यात : कागदी घोड्यांची लालफीतशाही
लोकमत विशेष
रंजित चिंचखेडे चुल्हाड
सिहोरा स्थित असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असले तरी, या वसाहतीला पाटबंधारे विभागाने कुलूप ठोकले आहे. यामुळे आठवडाभरापासून कार्यालयाचे स्थानांतरण अडले असून चर्चेला उधाण आले आहे.
सिहोरा येथे चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करणाऱ्या पाटबंधारे विभागाची वसाहत आहे. या वसाहतीत चार ते पाच खोल्या रिकाम्या असून कुणी कर्मचारी वास्तव्य करीत नाहीत. यामुळे या खोल्या उपयोगाविना पडून आहेत. या खोल्यांची डागडुजी करण्यात आली नसल्याने दुर्लक्षित झाली आहेत. वसाहतीत वास्तव्य करणारे कर्मचारी या विभागात नाहीत. तीन कर्मचाऱ्यांवर या विभागाचा डोलारा सुरू आहे. हे तिन्ही कर्मचारी मार्च २०१६ पर्यंत सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे या विभागाचे नंतरचे भवितव्य सांगता येत नाही. दरम्यान उपयोगिताविना पडून असलेली वसाहत शेतकरी व जनतेच्या उपयोगात आणण्याची ओरड परिसरात सुरू झाली. सिहोऱ्यात असणारा मंडळ कृषी कार्यालय जागेअभावी हरदोली गावात स्थानांतरित करण्यात आले आहे. सिहोरा या प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या गावात शेतकरी व जनतेच्या हिताची संपूर्ण कार्यालय असताना मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण खटकणारे ठरले. यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे कार्यालय पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत स्थानांतरीत करण्याची ओरड सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांची ८ कि़मी. अंतरची पायपीट थांबणार होती. शेतकऱ्यांचे हिताचा निर्णय असून प्रशासकीय कारभार करण्यात येणारी इमारत जीर्ण झाल्याने कृषी विभागाने मंडळ अधिकारी कार्यालय सिहोऱ्यात स्थानांतरणाला हिरवी झेंडी दिली. त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत एका खोलीला कृषी विभागाने रंगरंगोटी केली. या खोल्याची चाबी किल्ली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. कार्यालय स्थानांतरणाची चर्चा गेल्या आठ महिन्यांपासून होती. या वसाहतीत ८ आॅगस्टला आ. चरण वाघमारे यांचे हस्ते मंडळ कृषी कार्यालयाचे उद्घाटन झाले. गावागावात कार्यालय स्थानांतरण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यानंतर लगेच सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्याचे सांगत पाटबंधारे विभागाचे कार्यरत कर्मचाऱ्यांनी कुलूप ठोकले. वरिष्ठांचे आदेशाचे पालन करण्यात येत असल्याची माहिती कार्यरत कर्मचाऱ्यांनी दिली. या वसाहतीचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत केले जाणार आहे. या मुल्यांकनानुसार भाडे निश्चित करण्यात येणार असून करारबद्ध करण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. यामुळे गेल्या आठवडाभरा पासून मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण कागदी घोड्यांच्या लालफीतशाहीत अडले आहे. कागदी घोड्यांची प्रक्रिया यंत्रणेत लांबणीवर जात असल्याने कार्यालयाचे स्थत्तनांतरण वांद्यात आले आहे. मंडळ कृषी कार्यालयाने अशा प्रक्रियांना सुरूवात केली आहे. परंतु निश्चित कधी या कार्यालयाचे स्थानांतरण होणार असल्याचे कुणी सांगण्यास तयार नाहीत. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. आधी मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण करण्याची ओरड सुरू झाली आहे.
दुर्लक्षितपणाचा फटका
चुल्हाडात पाटबंधारे विभागाची वसाहत आणि रनेरा गावात असलेला विश्रामगृह दुर्लक्षितपणामुळे पडक्या अवस्थेत आहे. या जागेत फक्त सांगाडा शिल्लक आहे. यामुळे रिकाम्या वसाहती नागरिकांच्या कल्याणार्थ उपयोगात आणण्यासाठी सरसकट अन्य शासकीय कार्यालयांना देण्याची ओरड परिसरात सुरू झाली आहे. यामुळे या वसाहतीची जोपासणा होणार आहे तथा नागरिकांना न्याय मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
पाटबंधारे विभागाचा विश्रामगृह दुर्लक्षित झाला आहे. या विश्रामगृहाच्या जागेत पोलीस यांचे करिता निवासस्थानांचे बांधकाम करण्यात यावे. याशिवाय पाटबंधारे विभागाच्या जागेत असणारी रिकामी वसाहत अन्य शासकीय कार्यालयांना देण्यात यावी. जेणे करून एकाच व्यासपिठावर शेतकऱ्यांचे समस्या सोडविल्या जाणार असल्याचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांनी दिली.