घटत चालली मुलींची संख्या
By admin | Published: October 26, 2015 01:47 AM2015-10-26T01:47:29+5:302015-10-26T01:47:29+5:30
मुलींना वाचविण्यासाठी शासन-प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहेत. मात्र यानंतरही क्रूरता आपली सीमा सोडू शकली नाही.
१,००५ वरून ९२४ पर्यंत लिंगदरात घट
लोकमत विशेष
दिेवानंद शहारे गोंदिया
मुलींना वाचविण्यासाठी शासन-प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहेत. मात्र यानंतरही क्रूरता आपली सीमा सोडू शकली नाही. केंद्र शासनाच्या आदेशानुसार यावर्षी १९ जानेवारीपासून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान सुरू झाले. यानंतरही जिल्ह्यात भयावह वास्तव समोर येत आहे. एकीकडे शिक्षण क्षेत्रात सुधारणा झाली व होत आहे. परंतु दुसरीकडे लिंगदरात विशेष सुधारणा दिसून येत नाही. सन २०११ मध्ये प्रति एक हजार पुरूषांमागे एक हजार पाच मुली होत्या. या संख्येत आता घट होऊन ही संख्या ९२४ वर आली आहे.
‘डीएचआयएस-२’ च्या संबंधितांकडून मिळालेल्या संख्येनुसार, वर्ष २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात १८ हजार ९६७ प्रसूतींमध्ये १९ हजार ८९ बालकांचा जन्म झाला. यात ९ हजार ७५८ मुले तर ९ हजार १६ मुलींचा समावेश आहे. त्यावर्षी केवळ डिसेंबर महिन्यात प्रति हजार पुरूषांमध्ये १ हजार २२ मुली होत्या. एप्रिल, मे, जून, जुलै, आॅक्टोबर, नोव्हेंबर व मार्च महिन्यात मुलींचा जन्मदर ९२३ ते ९७३ च्या दरम्यान नोंद करण्यात आला होता. आॅगस्टमध्ये ८९८, सप्टेंबरमध्ये ८९३, जानेवारीमध्ये ८५३ व फेब्रुवारीमध्ये सर्वात कमी ७९१ नोंद करण्यात आली होती.
तर वर्ष २०१५-१६ मध्ये आतापर्यंतच्या लिंगदराच्या संख्येत सुधारणा दिसून येत आहे. प्रति एक हजार मुलांमागे ९७० मुलींचा जन्म झाला.
मे, जून महिन्यात स्थिती उत्तम पाहण्यात आली. परंतु एप्रिल, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांत स्थिती खूप वाईट राहिली.
यावर्षी आतापर्यंत ८ हजार ९६४ प्रसूतींमध्ये ९ हजार ३१ बालकांचा जन्म झाला. यात ४ हजार ४८६ मुले व ४ हजार ३५२ मुलींचा समावेश आहे. उर्वरित बालकांचा मृत्यू जन्माबरोबरच झाला.
अर्भकांच्या मृत्यूंत वाढ
जिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये आतापर्यंत लिंगदरामध्ये सुधारणा पाहण्यात आली आहे. परंतु नवजात बाळांच्या मृत्यूंची संख्या ०.४८ टक्के वाढली आहे. मागील वर्षी १९ हजार ८९ बालकांचा जन्म झाला होता. यापैकी ३१५ (१.६५ टक्के) अर्भकांचा मृत्यू झाला. तर यावर्षी आतापर्यंत नऊ हजार ३१ मधून १९३ (२.१३ टक्के) अर्भकांचा मृत्यू झाला आहे.