पोषण आहारासाठी मिळाले ३.१३ कोटी
By admin | Published: June 21, 2015 01:03 AM2015-06-21T01:03:29+5:302015-06-21T01:03:29+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची शालेय उपस्थिती वाढण्यासोबत त्यांना सकस आहार मिळण्यासाठी शाळेतच मध्यान्ह भोजन मिळण्याची व्यवस्था शासनाने केली आहे.
गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची शालेय उपस्थिती वाढण्यासोबत त्यांना सकस आहार मिळण्यासाठी शाळेतच मध्यान्ह भोजन मिळण्याची व्यवस्था शासनाने केली आहे. यावर्षीही पोषण आहारासाठी जुनाच मेनू कायम ठेवला असून जुन्याच एजन्सीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना हा आहार मिळावा यासाठी ३ कोटी १३ लाखांचा निधीही जिल्ह्यातील शाळांसाठी देण्यात आला आहे.
या पोषण आहाराला लागणारा खर्च २५ टक्के राज्य शासन तर ७५ टक्के केंद्र शासन देते. सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रासाठी गोंदिया जिल्ह्यातील १३५३ शाळांमधील विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीच्या मेनूत अद्याप कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या दिवशीपासून पोषण आहार मिळावा यासाठी ३ कोटी १३ लाख २२ हजार रूपये जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला दिले आहेत.
मागील वर्षी ज्या संघटनेने धान्याचा पुरवठा केला त्याच दि महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटीव्ह माकॅटींग फेडरेशनला दोन महिन्यासाठी पोषण आहार पुरवठ्याचा कंत्राट वाढवून देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील बालकांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्याची २५ टक्के रक्कम ७९ लाख ९० हजार तर केंद्र शासनाने ७५ टक्के रक्कम म्हणजे २ कोटी ३३ लाख ३२ हजार रूपये पाठविली आहे.
१ लाख २८ हजार बालकांना मिळणार भोजन
मध्यान्ह भोजन देण्याची सोय शासनाने केल्यामुळे यंदा गोंदिया जिल्ह्यातील एक लाख २८ हजार ३६ बालकांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे. वर्ग १ ते ५ वीे तील ७५ हजार १४७ तर वर्ग ६ ते ८ चे ५२ हजार ८८९ बालकांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे. या भोजनासाठी जुलै महिन्यासाठी निधी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला आहे. प्राथमिक विद्यार्थ्यासाठी ३६ लाख ८२ हजार तर उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ३२ लाख ५३ हजार रूपये वितरीत करण्यात आला आहे.
दरपत्रक निश्चित
वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्याना प्रत्येक विद्यार्थ्यामागे १०० ग्रॅम तांदूळ व इतर साहित्यासाठी ३.५० रूपये, वर्ग ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ व इतर साहित्यासाठी ५.२० रूपये दिले जातात. शासनाने या शालेय पोषण आहारात कोणकोणते साहित्य द्यावे ते प्रपत्रात नमूद करूनही प्रत्येक वस्तूचे दरही ठरवून दिले आहे. मूगडाळ ८४ रूपये किलो, मसूर डाळ ७३ रूपये किलो, तूर डाळ ८४.५० रूपये किलो, हरभरा ४८ रूपये किलो, चवळी ६१.७५, मटकी ६९, मूग ७८, वाटाणा ५९, सोयाबीन तेल ९९, कांदा, लसून १८५, हळद १९०, मीठ ९, जिरे १८०, मोहरे ५२ रूपये प्रतिकिलो असे दर ठरविण्यात आले आहे.