पूल झाले जीर्ण
By admin | Published: June 17, 2015 01:42 AM2015-06-17T01:42:23+5:302015-06-17T01:42:23+5:30
येथून ८ किमी अंतरावर असलेल्या ग्राम हेटी (गिरोला) येथे मालगुजारी तलाव असून या तलावामुळे जवळपास १०० एकर
तीन वर्षांपासून दुर्लक्ष : पाण्याच्या प्रवाहामुळे पडले भगदाड
सौंदड : येथून ८ किमी अंतरावर असलेल्या ग्राम हेटी (गिरोला) येथे मालगुजारी तलाव असून या तलावामुळे जवळपास १०० एकर शेती ओलिताखाली येते. तसेच वाल्मिक मच्छिमार सह संस्था म. गिरोला या संस्थेचे १२५ सभासद या तलावावर मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह चालवितात. हेटी येथील शेतातून मुरदोलीच्या कालव्यातून येथे पाणी येते. कालव्यावरील पूल ४४ वर्ष जुना असून जीर्ण झाला आहे. शिवाय पुलावर मोठे भगदाड पडले असून संबंधितांचे दुर्लक्ष आहे.
सदर तलावावर पाटबंधारे विभाग गोंदिया यांची देखरेख असून त्यावर शाखा अभियंता सौंदड यांचे नियंत्रण आहे. या तलावात येणारा पाण्याचा प्रवाह हेटी येथील शेतकऱ्यांच्या शेतात मुरदोलीवरुन येणाऱ्या कालव्यावरुन येत असतो. हा लोंढा येण्यासाठी कालव्यावर एक छोटेखानी पूल बांधण्यात आला आहे. परंतु या पुलाचे बांधकाम जवळपास ४४ वर्षे अगोदरचे असल्याने जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे पुलाच्या वरच्या भागाला पाण्याच्या प्रवाहामुळे फार मोठे भगदाड पडले आहे. यावर्षी तलावात येणारे पाणी या भगदाडावाटे कालव्यात जाईल व कालव्यावाटे तो इतरत्र जाईल. त्यामुळे तलावात पाण्याचा साठा होणार नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या समस्येकडे मागील तीन वर्षांपासून या क्षेत्रातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व आमदार आदी पदाधिकाऱ्यांनी अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल. तसेच मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या रोजगार व उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या तलावाचे गिरोला बाजूकडील तुडूम लिकेज असल्यामुळे तलावातील पाणी बेवारस वाहून जाते. तरी या गंभीर बाबीकडे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग नवेगावबांध यांनी जातीने लक्ष घालून यथाशीघ्र या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष तुळशीराम वलथरे व ईतर शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
अपघाताची शक्यता
४पुलाच्या वरच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडल्याने ये-जा करताना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४४ वर्षे जुन्या या पुलाची साधी डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे एखादा शेतकरी पुलावरील भगदाडात अडकण्याचीच अधिक शक्यता आहे. सदर पुलाचे नूतनीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.