रेल्वे प्रवाशांकडून ४० लाखांची वसुली
By admin | Published: June 19, 2015 01:20 AM2015-06-19T01:20:31+5:302015-06-19T01:20:31+5:30
येथील रेल्वे स्थानकातून दरदिवशी नागपूर ते दुर्गदरम्यान विविध रेल्वे गाड्यांमध्ये जवळपास ७० तिकीट चेकर्स असतात.
विनातिकीट प्रवास : तीन महिन्यांत १७ हजार ४६८ फुकट्यांना पकडले
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकातून दरदिवशी नागपूर ते दुर्गदरम्यान विविध रेल्वे गाड्यांमध्ये जवळपास ७० तिकीट चेकर्स असतात. त्यांनी मागील तीन महिन्यांत १७ हजार ४६८ अशा प्रवाशांना पकडले जे चुकीच्या पद्धतीने प्रवास करीत होते. अशा प्रवाशांकडून मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत ३९ लाख ९९ हजार १४८ रूपयांची वसुली करण्यात आली.
कुणाकडे तिकीट नव्हते तर कुणाकडे तिकीट असूनही ते दुसऱ्याच ठिकाणचा प्रवास करीत होते. असा चुकीचा प्रवास करणाऱ्या केवळ ५ टक्के प्रवाशांनाच पकडण्यात आले. तर उर्वरित ९५ टक्के प्रवाशी रेल्वे अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ घालून प्रवास करतात. अधिकाऱ्यांना लाच देवून प्रवास केला जातो. तर प्रसंगी पकडण्यात आल्यावर लाच देवूनच वाचणाऱ्यांची संख्यासुद्धा अधिक आहे.
देशातील सर्वात मोठे जाळे म्हणून रेल्वेची ख्याती आहे. आपल्या गंतव्य स्थळी पोहोचण्यासाठी आतासुद्धा रेल्वेच्या प्रवासाला प्रथम पसंती व प्राधान्य दिले जाते.
मात्र रेल्वेच्या संपत्तीला आतासुद्धा सामान्य नागरिक, प्रवाशी आपली संपत्ती समजत नाही. तसेच या संपत्तीला हानी पोहोचविण्याऱ्यांची संख्यासुद्धा कमी नाही. या प्रकारामुळे फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
काही प्रवाशी असेही आहेत की त्यांच्याकडे तिकीट तर असते, पण ही तिकीट दुसऱ्याच ठिकाणची असते. मात्र प्रवास तिसऱ्याच ठिकाणचा करणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी नाही. नागपूर ते दुर्ग दरम्यान तीन महिन्यात असे चार हजार ८१६ प्रवाशांना पकडण्यात आले.
मार्चमध्ये एक हजार १६९ प्रवाशांकडून रेल्वेने चार लाख ७३ हजार ६५५ रूपये, एप्रिलमध्ये एक हजार १८८ प्रवाशांकडून चार लाख ९३ हजार २१५ रूपये व मे महिन्यात दोन हजार ४५७ प्रवाशांकडून १० लाख ५५ हजार ३८६ रूपयांची वसूली करण्यात आली.
तीन महिन्यात चार हजार ८१६ प्रवाशांकडून २० लाख २२ हजार २५६ रूपयांची वसूली करण्यात आली. यापेक्षा अर्ध्याधिक रक्कम केवळ एका मे महिन्यात मिळाली.
विशेष म्हणजे मे महिन्यात लग्नसराईचे कार्यक्रम असतात. शक्यतो गर्दीची संधी साधून जवळील स्थानकाचे तिकीट काढून लांब अंतराचे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली व त्यामुळे पकडण्यात आलेल्यांच्या संख्येतही वाढ झाली. (प्रतिनिधी)
विनातिकीट २ हजार २८९ प्रवाशी
मागील तीन महिन्यांत गोंदिया ते नागपूर व गोंदिया ते दुर्ग दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या दोन हजार २८९ प्रवाशांना पकडण्यात आले. मार्च महिन्यात विनातिकीट ७१५ प्रवासी पकडण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाख १० हजार ७२१ रूपये वसूली करण्यात आले. एप्रिलमध्ये ८९८ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाख ५५ हजार ९०७ रूपये वसूल करण्यात आले. तर मे महिन्यात ७२० प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाख ८२ हजार ८१७ रूपयांची वसूली करण्यात आली.