जिल्हाधिकाऱ्यांसमोर नगराध्यक्षांनी मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:25 AM2017-07-23T00:25:50+5:302017-07-23T00:25:50+5:30
नगर पंचायतच्या अध्यक्षा पौर्णिमा शहारे यांनी नगराच्या विकास कामात आडकाठी येत असल्याचे सांगून
विकास कामांत बाधा : शहराच्या विकासासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : नगर पंचायतच्या अध्यक्षा पौर्णिमा शहारे यांनी नगराच्या विकास कामात आडकाठी येत असल्याचे सांगून त्यांनी विविध समस्यांचा पाढा जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या समोर वाचला.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे (दि.१९) अर्जुनी मोरगाव येथे आले होते. नगर पंचायतच्या अध्यक्षा पौर्णिमा शहारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेतली. भेटीदरम्यान नगराध्यक्षा शहारे यांनी अर्जुनी मोरगाव नगराचा विकास करण्याच्या हेतूने नगर पंचायतच्या वतीने कामकाज करताना विविध अडचणी निर्माण येत असतात. आजघडीला नगर पंचायतला नियमित सेवा देण्यासाठी मुख्याधिकारी कायम स्वरुपी लाभले नाही.
नगर पंचायतचा प्रशासकीय डोलारा चालविण्यासाठी नियमित कर्मचाऱ्यांचा अभाव सातत्याने भेडसावत आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नगराच्या विकास कार्यात अडचणी निर्माण होत आहे.
हंगामी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याने अनेक समस्या नव्याने निर्माण होत आहे. नगर पंचायतचा कार्यभार सुरळीत चालल्याविण्या बरोबरच नगरातील जनसामन्यांच्या कामकाजाला गती देण्यासाठी नगरपंचायतला नियमित सेवा देणारे मुख्याधिकारी देण्यात यावे, कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनावर निर्णय द्यावा, अशी मागणी नगराध्यक्षा पौर्णिमा शहारे यांनी भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना केली.