आरटीईअंतर्गत ३३८ बालकांचा प्रवेश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:47+5:302021-08-14T04:34:47+5:30
हिंगोली : वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठीच्या २५ टक्के राखीव जागांवर ३३८ विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे, तर १८२ ...
हिंगोली : वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठीच्या २५ टक्के राखीव जागांवर ३३८ विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे, तर १८२ बालकांनी तात्पुरता प्रवेश घेतला असून पालकांचे दुसऱ्या फेरीकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने आरटीईअंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील ७९ शाळांनी यासाठी नोंदणी केली होती. यामध्ये राखीव ५३० जागांसाठी राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. कोरोनामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढही मिळाली होती. त्यानुसार ५३० जागांसाठी ९८७ बालकांचे ऑनलाइन अर्ज आले होते. पहिल्या प्रवेश फेरीसाठी ४७८ बालकांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या बालकांनी ३१ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र मोफत प्रवेशासाठी पालकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ३१ जुलैअखेर ३३८ बालकांचाच प्रवेश निश्चित झाला आहे, तर १८२ बालकांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे.
दुसऱ्या फेरीकडे पालकांचे लक्ष
पहिल्या फेरीत ४७८ बालकांची निवड करण्यात आली होती. मात्र यातील ३३८ बालकांनीच प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे आणखी १९२ जागांवर प्रवेश देणे बाकी आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या बालकांनी शाळेत प्रवेश घेण्यासाठीची मुदत संपली आहे. त्यामुळे दुसरी प्रवेश फेरी केव्हा लागते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
आरटीईअंतर्गत अशी आहे आकडेवारी
आरटीईअंतर्गंत शाळा - ७९
एकूण राखीव जागा - ५३०
एकूण अर्ज - ९८७
पहिल्या फेरीत निवड - ४७८
तात्पुरते प्रवेश - १८२
प्रवेश निश्चित - ३३८