चार दिवसांनंतरही सॅम्पल नेण्यासाठी मिळेना वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:58+5:302021-08-15T04:30:58+5:30
हिंगोली : रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून ग्रामीण पोलिसांनी चार ऑटो पकडून ठाण्यात लावल्या. या कारवाईला ...
हिंगोली : रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून ग्रामीण पोलिसांनी चार ऑटो पकडून ठाण्यात लावल्या. या कारवाईला चार दिवस उलटले. मात्र, अद्याप पुरवठा विभागाने धान्याचे सँपल नेले नसल्याने पुढील कारवाई थांबली आहे. पोलिसांवर वाहने सांभाळण्याची वेळ आली आहे.
हिंगाेली तालुक्यातील वडद पाटी परिसरातून रेशनचे धान्य काळ्या बाजारात नेले जात असल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, सहायक पोलीस निरीक्षक बळिराम बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी १० ऑगस्ट रोजी वडद पाटी परिसरात चार ऑटोची तपासणी केली. यामध्ये जवळपास पावणेआठ क्विंटल तांदूळ व १३ क्विंटल गव्हाचे कट्टे चार ऑटोमध्ये आढळून आले. हे धान्य रेशनचे असल्याच्या संशयावरून पोलिसांनी चारही ऑटो हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात लावले. तसेच दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयास धान्याचे नमुने नेण्यासंदर्भात पत्रही दिले. मात्र, चार दिवस उलटून एकही अधिकारी, कर्मचारी धान्याचे सॅम्पल नेण्यासाठी आला नाही. त्यामुळे चारही ऑटो चार दिवसांपासून पोलीस ठाणे आवारात उभे आहेत. पावसामुळे धान्य खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सॅम्पल नेण्यासाठी तहसीलचे अधिकारी, कर्मचारी येत नसल्याने धान्याची वाहने सांभाळण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. दरम्यान, महिनाभरात पोलिसांनी दोन ते तीन ठिकाणी कारवाई करीत रेशनचे धान्य पकडले आहे. रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्यांवर पुरवठा विभागाने कारवाई करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांची असते. मात्र, पुरवठा विभागाला काळ्या बाजारात धान्य नेणारा एकही विक्रेता दोन महिन्यांत तरी सापडला नसल्याचा आरोप होत आहे.