कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवा ! संतप्त नागरिकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:42 IST2019-09-24T23:41:32+5:302019-09-24T23:42:49+5:30
शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगरपालिकेतील मुख्याधिका-यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले.

कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवा ! संतप्त नागरिकांचा ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले.
शहरातील अण्णा भाऊ साठे नगरातील महिला, पुरूष व युवक नगपालिकेत मंगळवारी मोठ्या संख्येने जमले होते. येथे उभारण्यात येणारा कत्तलखाना हा गैरकायदेशीर आहे. वसाहतीपासून पाच किमी अंतरावर कत्तलखाना असायला पाहिजे; परंतु तो आमच्याच वसाहतीमध्ये सार्वजनिक ठिकाणी सुरू केला जात आहे. कत्तलखान्यामुळे येथील नागरिक व चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कत्तलखान्यातील सांडपाणी व टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शकतेनुसार करणे बंधनकारक असतानाही या नगरातील मागील पंचवीस वर्षांपासून बंद पडलेल्या जनावरांचा कत्तलखाना नागरिकांची संमती न घेताच सुरू केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरूष व युवक नगरपालिकेत जमले होते. यावेळी संतप्त महिलांनी न. प. प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबविण्यात आले नाही तर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर प्रदीप खंदारे, जय घोडे, अक्षय डाखोरे, कैलास शिखरे, दिगंबर हानवते, उत्तम चांदणे, अनिल खडसे, नितीन गालफाडे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.
दरम्यान, या नागरिकांनी साईटवरही काम थांबविण्यासाठी दबाव आणला होता.