ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला; साखर महाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:40+5:302021-08-14T04:34:40+5:30
हिंगोली : कोरोनाकाळात महागाई कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या काळात तर महागाईने उच्चांक गाठला आहे. गॅस, खाद्यतेल, ...
हिंगोली : कोरोनाकाळात महागाई कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या काळात तर महागाईने उच्चांक गाठला आहे. गॅस, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल दरवाढीनंतर आता साखरेच्या किमतीतही क्विंटलमागे ५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. महागाईमुळे दैनंदिन बजेट कोलमडले आहे.
का वाढले भाव
मागील सहा महिन्यांपासून साखरेच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नाही. सध्या ३४०० रुपये प्रतिक्विंटल दराने साखर विक्री होत आहे. सण, उत्सव असले तरी साखरेच्या मागणीत कोणतीही वाढ नसल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.
खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. साखरेच्या किमतीत हिंगोलीत तरी कोणतीही वाढ झाली नाही. सध्या ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल साखर विक्री होत आहे. मागील काही दिवसांपासून साखर वाढली नसल्याचे एका ठोक विक्रेत्याने सांगितले.
दरातही आढळते तफावत
ठोक व्यापारी ३४०० ते ३४५० रुपये साखरेचे दर असल्याचे सांगत असले, तरी हिंगोली शहरातच ठिकठिकाणी प्रतिकिलो ३५ रुपयांपासून ते ३८ रुपयांपर्यंत साखर विक्री होत आहे.
महिन्याचे बजेट वाढले
प्रतिक्रिया...
खाद्यतेल, गॅसचे दर वाढल्याने अगोदरच सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. आता साखरेचे दर किंचित वाढले असले तरी यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
- स्मिता कोल्हे
मागील काही दिवसांपासून महागाई चांगलीच वाढली आहे. महिन्याचे बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे. आता ऐन सणासुदीत साखरेचे भाव वाढले आहेत.
- अश्विनी आठवले