पाकच्या लष्करी कारवाईत ५५ अतिरेकी ठार
By admin | Published: December 28, 2014 02:00 AM2014-12-28T02:00:42+5:302014-12-28T02:00:42+5:30
अफगाणिस्तानच्या सीमेजवळील अस्वस्थ आदिवासी विभागातील सैन्याच्या तपासणी नाक्यांवर हल्ला करणारे १६ अतिरेकी पाक सैन्याने ठार केले.
पेशावर : अफगाणिस्तानच्या सीमेजवळील अस्वस्थ आदिवासी विभागातील सैन्याच्या तपासणी नाक्यांवर हल्ला करणारे १६ अतिरेकी पाक सैन्याने ठार केले. पाक सैन्याने दत्ताखेल भागात केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ३९ अतिरेकी ठार झाले.
ओराकझाईमध्ये शिनदारा आणि खजाना कानदाओ येथील तपासणी नाक्यावर शनिवारी पहाटे अतिरेक्यांनी हल्ला केला. सैन्याने त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात १६ जण ठार, तर आणखी २० जण जखमी झाले. चार सैनिकही यात जखमी झाले. दरम्यान, पाकिस्तानने अस्वस्थ दत्ताखेल भागात केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये दोन दहशतवादी कमांडोजसह ३९ अतिरेकी ठार झाले, असे लष्कराचे प्रवक्ते असीम बाजवा यांनी सांगितले.
उत्तर वजिरीस्तानातील अशांत भागात लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यांत २३ अतिरेकी ठार झाल्यानंतर या दोन तपासणी नाक्यांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. सरकारने अतिरेक्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केल्यानंतर शुक्रवारी शेकडो संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
पाकमध्ये स्वायत्त असलेल्या सात विभागांपैकी उत्तर पूर्वेकडील ओराकझाई हा एक आहे. (वृत्तसंस्था)
४कराची : फाशीची शिक्षा सुनावली गेलेले २४ कैदी क्वेटा येथील तुरुंगातून माछ येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहेत. तुरुंग फोडून हे कैदी पळून जाण्याची भीती असल्यामुळे त्यांना हलविण्यात आले आहे, असे क्वेटा तुरुंगाच्या अधीक्षकांनी सांगितले. लाहोरमधील कोट लखपत तुरुंगावर हल्ला करण्याचा अतिरेक्यांचा कट पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी हाणून पाडल्यानंतर या कैद्यांना हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
फाशीवर बंदी घाला; मून यांचे आवाहन
४संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव बान-की-मून यांनी पाक सरकारला दोषींना फासावर चढविण्याची प्रक्रिया बंद करण्याचे आवाहन केले आहे. पाक सरकारने पुन्हा एकदा मृत्युदंडावर बंदी घालावी, असे ते म्हणाले.
४पेशावर हल्ल्यानंतर पाक सरकारने फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला होता. या हल्ल्यात १५० जणांचा मृत्यू झाला होता. बान-की-मून यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर बातचीत केली.
४झकि-उर-रहमान लख्वीला मिळालेल्या जामिनाला आव्हान देण्याची सगळी तयारी पाकिस्तान सरकारने केली आहे.
४न्यायालयाने जामिनासंदर्भात दिलेल्या आदेशाची प्रत मिळाली असल्याची माहिती सरकारी वकील चौधरी अझहर यांनी शनिवारी दिली. दहशतवादविरोधी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत आम्हाला मिळाली असून आम्ही अपिलाची तयारी केली आहे.
दोन आठवड्यांची सुटी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपल्यानंतर उच्च न्यायालयात जामिनाला आव्हान दिले जाईल, असे चौधरी अझहर यांनी सांगितले. न्यायालयाने निश्चित असे कोणतेही कारण न देता आदेशाची प्रत देण्यास विलंब लावल्यामुळे सरकारची मोठी अडचण झाली होती. न्यायालयाच्या निर्णयाला सुटीच्या न्यायालयात आव्हान देता येत नाही, कारण आव्हान देणे हे ‘तातडीचे प्रकरण’ नसते, असे अझहर म्हणाले. लख्वीला जामीन मंजूर झाल्यानंतर भारताने तीव्र टीका केली होती. पेशावरमध्ये १६ डिसेंबर रोजी तालिबान्यांनी शाळेवर केलेल्या हल्ल्यांत १३२ विद्यार्थ्यांसह १५० जण ठार झाले होते. त्यानंतर लगेचच लख्वीला जामीन मंजूर झाला होता.