हरणांनी खाल्ली तरी चालेल अशी ‘पिशवी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 09:32 AM2022-05-30T09:32:40+5:302022-05-30T09:35:01+5:30

खरं म्हणजे प्लास्टिकची पिशवी पोटात गेल्यामुळे तृणभक्षी प्राण्यांचा मृत्यू ओढवणं हा जगभर बघायला मिळणारा दुर्दैवी प्रकार आहे.

A bag that can be eaten by deer! | हरणांनी खाल्ली तरी चालेल अशी ‘पिशवी’!

हरणांनी खाल्ली तरी चालेल अशी ‘पिशवी’!

googlenewsNext

जपानमधल्या हुदेतोषी मुत्सकावा नावाच्या माणसाने हरणांचा जीव वाचवण्यासाठी  वेगळ्या प्रकारच्या पिशव्या बनवल्या आहेत. जपानमधलं  ‘नारा’ हे शहर लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. या भागात सिका  जातीची हरणं राहतात. ही हरणं जपानचा राष्ट्रीय ठेवा समजली जातात.  नारामध्ये  येणाऱ्या पर्यटकांच्या झुंडीनी या हरणांना खाऊ घालून एक नवाच प्रश्न उभा केला आहे. जुलै २०१९मध्ये नारामध्ये  ९ सुंदर हरणं मृतावस्थेत सापडली.  त्यांच्या मृत्यूचं कारण होतं, प्लास्टिकच्या पिशव्या! ही सगळी नऊच्या नऊ हरणं प्लास्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे दुर्दैवाने मृत्युमुखी पडली होती.

खरं म्हणजे प्लास्टिकची पिशवी पोटात गेल्यामुळे तृणभक्षी प्राण्यांचा मृत्यू ओढवणं हा जगभर बघायला मिळणारा दुर्दैवी प्रकार आहे. भारतात देखील गायींच्या पोटात प्लास्टिक सापडल्याच्या अनेक घटना नेहमीच वाचायला मिळतात. इतकंच नाही, तर समुद्रातील माशांच्या पोटात प्लास्टिक आढळायला लागलं. त्याला आता अनेक वर्षे उलटून गेली. सगळ्या जगाला गिळंकृत करू पाहणाऱ्या या प्लास्टिकच्या भस्मासुराच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी अनेक लोक आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.

हुदेतोषी हा नारामध्ये भेटवस्तू विकणाऱ्या एका दुकानात काम करतो. प्लास्टिक खाल्ल्यामुळे हरणांचा मृत्यू झालेला बघितल्यामुळे हुदेतोषी अस्वस्थ झाला आणि त्याने कागद बनवणाऱ्या एका स्थानिक उत्पादकाची मदत घेतली. त्या दोघांनी मिळून ‘शिकागामी’ किंवा हरणाच्या कागदाची निर्मिती केली. दुधाची खोकी आणि भाताचं तूस एकत्र करून तयार केलेल्या या कागदाच्या त्यांनी पिशव्या बनवल्या आहेत. मत्सुकावा म्हणतो की, आमच्या असं लक्षात आलं की, तांदूळ पॉलिश  करण्याच्या प्रक्रियेमध्ये भाताचं तूस बव्हंशी वायाच जातं.  हा कागद बनवण्यामुळे त्या कचऱ्याचं प्रमाणही कमी होत आहे.

आजवर या पिशव्या नाराच्या स्थानिक बाजारपेठेत आणि तोडाईजी या तिथल्या प्रमुख मंदिरात वापरल्या गेल्या आहेत. या मंदिराने आणि बँकांनी या ४,००० ते ५,००० पिशव्या प्रत्येकी १०० येन (सुमारे ६५ रुपये) किमतीला पायलट प्रोजेक्ट म्हणून विकत घेतल्या. हुदेतोषी मुत्सकावा म्हणतो की, जसजशा जास्त ऑर्डर्स मिळायला लागतील तशी प्रत्येक पिशवीची किंमत अजूनही कमी होईल. 

नारामधल्या प्रत्येक प्लास्टिकच्या पिशवीऐवजी या शिकागामीच्या पिशव्या वापरल्या जाव्यात, असं त्याचं स्वप्न आहे. तो म्हणतो, प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे हरणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने लोकांवर खूप नकारात्मक परिणाम होतो. असं वाटतं, की नारा ही हरणांना सांभाळणारी जागा नसून हरणांची दफनभूमी आहे. मात्र, या पिशव्यांमुळे हरणं सुरक्षित राहतात. या पिशव्या जपान फूड रिसर्च लॅबोरेटरीजने तपासलेल्या आहेत आणि त्या  हरणांनी खाण्यासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. या पिशव्यांमध्ये वापरण्यात आलेले पदार्थ  हे एरवी हरणांना जे खाद्य दिलं जातं त्यातील घटकांपासूनच बनवलेले आहेत. 

एखाद्या पिशवीच्या आतला पदार्थ खाण्याचा हरणं किंवा गायी  प्रयत्न करतात. मात्र, त्यांना त्याच्या आतील पदार्थ काढून खाता येत नाही आणि अर्थातच तसं केलं पाहिजे हे त्यांना समजतही नाही.  त्यामुळेच हे प्राणी वरच्या प्लास्टिकच्या पिशवीसकट आतला पदार्थ खाऊन टाकतात.  मात्र, प्लास्टिकची पिशवी ते पचवू शकत नाहीत आणि मग ती प्लास्टिकची पिशवी त्यांच्या पोटात राहून जाते. काही काळात अशा अनेक पिशव्या हे प्राणी खाऊ शकतात आणि काही काळानंतर त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवतो. मृत्युमुखी पडलेल्या सिका हरणांपैकी एकाच्या पोटात ४ किलो प्लास्टिक सापडलं होतं... पुन्हा असं होऊ नये म्हणून हुदेतोषी धडपडतो आहे.

...आता हरणं राहतील सुरक्षित!
 नारामध्ये हरणांना घालण्यासाठी विशिष्ट प्रकारचं खाद्य मिळतं. पण, काही पर्यटक हरणांसाठी  प्लास्टिकमध्ये पॅक करून खाणं आणतात  आणि नंतर ती पिशवी तशीच तिथे टाकून देतात. हरणांना त्या पिशवीला खाण्याचा वास येतो आणि ते अन्न समजून ती प्लास्टिकची रॅपर्स खातात. मात्र, आता या नवीन पिशव्यांमुळे नारामधील हरणांचे दुर्दैवी मृत्यू थांबतील किंवा निदान त्यांचं प्रमाण कमी होईल, अशी आशा आहे.

Web Title: A bag that can be eaten by deer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.