लेखः अरब 'कनेक्शन', भीती अन् खंत! इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या मुळाशी नेमकं दडलंय काय?  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 03:15 PM2023-10-11T15:15:30+5:302023-10-11T15:21:19+5:30

अरबांच्यात आपापसात मतभेद आहेत, युद्ध होत आलेली आहेत आणि त्याने हा संघर्ष प्रदीर्घ काळ प्रभावीतही झालेला आहे. ज्या तीन युद्धांचा उल्लेख केला जातो, ती इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातली नाहीत तर इस्रायल आणि अरब राष्ट्रातली आहेत.

analytical article on reasons, history, politics and different angles of Insrael Palestine conflict and attack by Hamas | लेखः अरब 'कनेक्शन', भीती अन् खंत! इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या मुळाशी नेमकं दडलंय काय?  

लेखः अरब 'कनेक्शन', भीती अन् खंत! इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या मुळाशी नेमकं दडलंय काय?  

>> डॉ. अजित जोशी

गेल्या शनिवारपासून जग हमासने पॅलेस्टाईनमधून इस्रायलवर केलेल्या हल्ल्याने ढवळून निघालेलं आहे. कोणे एके काळी अरब-इस्रायल युद्ध हा चर्चेचा विषय असे. इस्रायलने  केलेला अरबांचा पराभव, त्यांचं कुशल हेरखातं, दुसऱ्याच्या देशात जाऊन त्यांनी केलेल्या कारवाया, हे चर्चेचे आणि पुस्तकाचे विषय असत. पण गेल्या काही काळात तिथला संघर्ष स्थानिक पातळीवर केंद्रित झाला. त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटायचे कमी झाले. तेलाच्या किंमतींवरचे परिणामही घटले. आणि हळूहळू सार्वजनिक स्मृतीतून हा विषय मागे पडायला लागला. या पार्श्वभूमीवर परवाच्या हल्ल्याने बरेच लोक अचानक त्या प्रश्नावर खडबडून जागे झालेत असं दिसतं. यात तो हल्ला मोठा आहे हे खरंच, पण या वेळेला घडलेल्या दोन गोष्टींनी या घटना लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. एक म्हणजे इस्रायलची सुप्रसिद्ध गुप्तहेर यंत्रणा अक्षरशः झोपेत असलेली सापडली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी हेर या सगळ्यांना बगल देत हजारो रॉकेट्स आणि शेकडो सैनिक हमासने इस्रायलच्या भूमीत घुसवले. त्याचा परिणाम म्हणजे, इस्रायलने अभूतपूर्व अशी सैन्य आणि नागरिक यांची मनुष्यहानी सहन केली. आजही हमासने अनेक सैनिक, अधिकारी आणि नागरिक यांना पॅलेस्टाईनच्या भूमीत ओलीस म्हणून पळवून नेलेलं असावं, असा संशय आहे. एकाएकी इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या आकड्यांमध्ये नेहमी असते तशी तफावतीची दरी दिसायची बंद झाली. या सगळ्या घटनाक्रमाच्या विश्लेषणांना आता जोरात सुरुवात झालेली आहे. यात इस्रायलच्या जन्मापासूनचा इतिहास, तीन युद्ध, त्या देशाचा कायमच आक्रमक राहिलेला युद्धखोर अभिनिवेश, त्याचे आजचे पंतप्रधान आणि अशा अनेक तपशीलांचा उल्लेख सर्वत्र दिसतो. मात्र या संघर्षाचा अरब पैलू तेवढाच किंबहुना त्याहून महत्त्वाचा आहे आणि तो समजल्याशिवाय आजचा घटनाक्रम नीट समजणार नाही. 

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, अरब हा एक वंश असला तरी एक देश नाही आणि अगदी खरं सांगायचं तर एक धर्मही नाही. अरब ज्यू नावाचाही एक समाजघटक आहे आणि कट्टर ज्यूंनी जरी त्याला आव्हान दिलं, तरी अगदी एकेकाळच्या इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायरनेही त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे अरबांच्यात आपापसात मतभेद आहेत, युद्ध होत आलेली आहेत आणि त्याने हा संघर्ष प्रदीर्घ काळ प्रभावीतही झालेला आहे. ज्या तीन युद्धांचा उल्लेख केला जातो, ती इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातली नाहीत तर इस्रायल आणि अरब राष्ट्रातली आहेत. १९७३ च्या योम किप्पूर युद्धापर्यंत तरी अरब लढत होते ते पॅलेस्टाईन निर्माण होण्यासाठी नव्हे तर तो भूभाग आपल्या राष्ट्रात सामील होण्यासाठी! समजा यातल्या कोणत्याही युद्धात जर इस्रायल नामशेष झाला असता तर बहुदा जॉर्डन, इजिप्त, सीरिया, सौदी यांच्यात आपापसातच संघर्ष उभा राहिला असता. ७३ च्या युद्धानंतर अरब राष्ट्रांच्या दृष्टिकोनात बदल व्हायला लागला. एक तर काही करून नजीकच्या भविष्यात तरी आपण इस्रायलला युद्धात हरवू शकत नाही, याची स्पष्ट जाणीव अरब राष्ट्रांना झाली. त्याच वेळेला सत्तरच्या दशकात तेलाचा पैसा अरबांच्या खिशात खुळखुळायला लागला. ऐंशीपासून अरबांचा पारंपरिक मित्र रशिया कमकुवत व्हायला लागला. या सगळ्यातून पाश्चिमात्यांशी जुळवून घेणं अरबांना अपरिहार्य वाटायला लागलं. असंही पॅलेस्टाईनचं महत्त्व भावनिक होतं. त्यातून सामरिक किंवा आर्थिक फायदे फार मोठे नव्हते. सादातच्या इजिप्तने सुरुवात करून एकेका अरब राष्ट्राने या प्रश्नातून अंग काढून घ्यायला सुरुवात केली. मागे उरले ते पॅलेस्टाईन भूभागातले स्थानिक, पॅलेस्टिनी अरब! ते बिचारे आपल्या भूभागासाठी लढत होते. आता ते कोणालाच नकोसे झाले. अगदी तेलाच्या भरभराटीसोबत अरब राष्ट्रांत अनेक देशातले 'परप्रांतीय' यायला लागले, त्यातही या पॅलेस्टिनी अरबांना दुजाभावाची वागणूक मिळायला लागली. आईबापाविना पोराच्या प्रॉपर्टीची केस लढायला चार काकांनी उत्साह दाखवावा आणि केस हरल्यावर मात्र त्याच अनाथाला हाडहाड करावी ती गत पॅलेस्टिनी अरबांची झाली. 

या परिस्थितीचा अंदाज आल्यावर एकेकाळचा 'दहशतवादी' अराफातने आपली भाषा बदलली. 'इस्रायल देशच नको', इथून सुरू झालेली आपली मागणी सोडून  'स्वातंत्र्य नाही तर स्वायत्तता तरी द्या', असा मवाळ सूर त्याने लावला. यातून पॅलेस्टिनी ऑथॉरिटीची निर्मिती झाली. ऐतिहासिक ऑस्लो करार झाला. हा प्रश्न सुटायच्या शक्यता जगाला दिसायला लागल्या. दुर्दैवाने इथून पुढे या भूभागाच्या दशावताराला अजून एक रक्तरंजित वेगळं वळण लागलं.    

स्वायत्त भूभाग दिला तरी पॅलेस्टाईनच्या अनेक नाड्या इस्रायलने स्वतःच्या मुठीत ठेवलेल्या होत्या. एका बाजूला असलेला गाझा आणि दुसरीकडची वेस्ट बँक यातल्या प्रवासावर अनेक निर्बंध लादले गेले. पाणीपुरवठा अनियमित, विजेचं सतत भारनियमन आणि आरोग्यसेवेच्या वापरात अनेक अडथळे अशा अनेक गोष्टींनी या भूभागातलं जीवन खडतर होतं. तशात अरबांच्यातल्या दहशतवादी गटांचे रॉकेटहल्ले, बॉम्ब ब्लास्ट, आत्मघातकी हल्ले, ही हिंसा सुरूच होती. आक्रमक, पण शांततावादी मार्गाने चाललेल्या इंतीफाडा या प्रतिकारालाही त्यांनी हिंसक वळण दिलेलं होतं. माथेफिरू अरबांच्या हिंसक कृती आणि इस्रायल सैन्यदलांच्या हिंसक कारवाया यात निरपराध सामान्यांची ससेहोलपट होत होती. 

तशात आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या घटनांनी नव्वदीच्या दशकातली समीकरणं उलटीपालटी झाली होती. इराकविरुद्ध अमेरिका, अरब देश आणि इस्रायल हातात हात घालून उभे राहीले. ९/११ नंतर जग इस्लामी दहशतवाद आणि त्यानिमित्ताने एकूणच अरबांवर सगळं जगच उलटलं होतं. यातून अरब राष्ट्रं पॅलेस्टाईनच्या बाजूने उभी राहतील आणि तेलाचं शस्त्र वापरतील, या शक्यता मावळायला लागल्या. 'कोनी नई कोनचा', ही भावना पॅलेस्टिनी अरबांच्यात बळावायला लागली. त्यांच्याएव्हढ्याच एकट्या पडलेल्या इराणशी शिया असून सूत जुळवायला हमासने यातूनच सुरुवात केली. पण उर्वरित जगाचं औदासिन्य इस्रायललाही त्रासदायक ठरलं. जोपर्यंत अरब देशात रशिया प्रबळ होता, अमेरिकाविरोध तीव्र होता, तोपर्यंत अमेरिकेला इस्रायलसारखी आपली वसाहत हवी होती. पण नव्वदीनंतर जग बदलायला लागल्यावर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचाही त्या भूभागातला रस कमी होत गेला. शांतीप्रक्रियेतला दबावही तसा कमी होत गेला. आजच्या संघर्षाला ही सगळी पार्श्वभूमी आहे. या खेपेला पेटलेल्या युद्धात अरब राष्ट्र नव्हे तर पॅलेस्टाईनमधले स्थानिक आहेत. 

पण या सर्वांच्या मुळाशी काय आहे? आज आपण सुरक्षित स्थितीत असलो तरी मुळात या भूभागात आपण उपरे आणि अल्पमतात आहोत. उद्या अरब वरचढ झाले तर आपला देशच समुद्रात ढकलून देतील, ही इस्रायलमधल्या काही जणांची भीती आहे. आपल्याच मुलुखात उपरं झाल्याची खंत आणि त्यात इस्रायल करत असलेली नाकेबंदी, यामुळे ज्यू असेपर्यंत आपण कधीच सुखात राहणार नाही, असं पॅलेस्टाईन अरबाना वाटतं. यातून दोन्ही समाजात एकेकाळचा बेन गुरियन किंवा अराफातचा समाजवाद किंवा खरं तर राजकीय संधीसाधूपणा मागे पडून धार्मिक कट्टरतावाद वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या माथेफिरूंनी परस्परांबद्दल असलेल्या संशय आणि असुरक्षिततेच्या आगीत तेल ओतलंय आणि राजकारण्यांनी त्यावर स्वतःच्या पोळ्या भाजलेल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र हे आपल्या समाजाचंच नुकसान करतायत. हमासचा निःपात करू, अशा १५ वर्षांपासून आरोळ्या ठोकणारा नेत्यान्याहू सत्तेत असून सगळ्या गुप्तचर यंत्रणा गाफील राहिल्या. आज इस्रायलचं नाक कापल्याबद्दल खुश असलेली हमास उद्या पॅलेस्टाईन अरबांची तबाही घेऊन येणार आहे. पण त्या भूभागातल्या सामान्य नागरिकांसाठी मात्र 'इस रात की सुबह नहीं', अशी परिस्थिती आहे.

भारतातल्या काहींना 'आता इस्रायल कसा बदला घेईल' याने सुरसुरी येते, तर काहींना हमासच्या प्रेमाचा पुळका आलाय. पण प्रत्येक समाजात एक जहाल आणि मवाळ, कडवे आणि समजूतदार, युद्धखोर आणि सामंजस्यवादी असे मतप्रवाह असतात. आधी कोण आणि नंतर कोण, 'क्रिया' कोणती आणि 'प्रतिक्रिया' कोणती यावर खल करण्याऐवजी या मतप्रवाहांच्यात अंतर्गत संतुलन राहिलं, तर त्यांना एकमेकांशीही संवाद साधता येतो. भावनिक आवाहनाच्या मदमस्त लाटेवर स्वार झालं तर विसंवाद नाही तर वितंडवाद येतो आणि त्याचीच पुढची पायरी विनाश आहे. तेव्हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनपैकी कोणाची बाजू घेण्याआधी आपण आपल्यातले हमास आणि नेत्यान्याहू ओळखून मोडून काढले पाहिजेत. नाहीतर असा विनाश आपल्या दरवाज्यात यायला वेळ लागणार नाही…!

Web Title: analytical article on reasons, history, politics and different angles of Insrael Palestine conflict and attack by Hamas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.