इवलासा देश, मात्र जगापुढे वेगळेच टेन्शन; मालदीवमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 13:06 IST2024-01-16T13:05:50+5:302024-01-16T13:06:16+5:30
मालदीवची राजधानी मालेपासून काही किलोमीटर अंतरावर समुद्राजवळ थिलाफुशी हे उथळ ठिकाण होते. इतरत्र जाण्यासाठी याच भागातून जावे लागते.

इवलासा देश, मात्र जगापुढे वेगळेच टेन्शन; मालदीवमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील पर्यटनावरून वादविवाद वाढला. मात्र अवघ्या ३०० चौरस किमी क्षेत्रफळ आणि ५ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या देशात पर्यटकांमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कृत्रिम बेट तयार केले आहे. त्यास थिलाफुशी बेट म्हणून ओळखले जाते. परंतु, त्याचा फटका जगाला बसत आहे.
कचऱ्यासाठी असाही तोडगा
मालदीवची राजधानी मालेपासून काही किलोमीटर अंतरावर समुद्राजवळ थिलाफुशी हे उथळ ठिकाण होते. इतरत्र जाण्यासाठी याच भागातून जावे लागते. त्यामुळे येथे सर्वाधिक कचरा निर्माण होतो. परिणामी या भागात बराच कचरा साचू लागला. सुमारे १२४ एकरांवर कचऱ्याचे भलेमोठे बेट तयार झाले आहे.
निर्वासितांवर जबाबदारी
बेटावरील कचरा व्यवस्थापनाचे काम मालदीव सरकारने बांगलादेशी निर्वासितांना दिले आहे. हे लोक जणू नरकसदृश परिस्थिती जगत आहेत. देशभरातील कचरा या बेटावर आणला जातो. एकतर तो जमिनीखाली गाडला जातो किंवा जाळला जातो. त्याचा परिणाम येथील पर्यावरणासोबतच मानवी हक्कांवरही होत असल्याचा आरोप पर्यावरणवादी करतात.
अनेक देशांना फटका
मालदीवमधील कचऱ्याचा केवळ हिंद महासागरच नव्हे तर परिसरातील अनेक देशांना फटका बसत आहे. थिलाफुशी येथील कचऱ्याच्या बेटावरील कचरा वाहत जात अनेक देशांच्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचल्याचा दावा एका एनजीओने केला.