पाकने १५१ कैद्यांना भारताकडे सोपविले
By admin | Published: May 27, 2014 05:52 AM2014-05-27T05:52:26+5:302014-05-27T05:52:26+5:30
पाकिस्तान सरकारने कारावासात असलेल्या १५१ कैद्यांना सोमवारी वाघा सीमेवर भारतीय अधिकार्यांकडे सोपविले.
लाहोर : पाकिस्तान सरकारने कारावासात असलेल्या १५१ कैद्यांना सोमवारी वाघा सीमेवर भारतीय अधिकार्यांकडे सोपविले. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ््यात पंतप्रधान नवाझ शरीफ सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने पाक सरकारने सद्भावनावृद्धीच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. कराची येथून ५९ आणि हैदराबाद येथून ९२ भारतीय कैद्यांची रविवारी सुटका करण्यात आली. यामध्ये १५० मच्छीमार आणि एका अन्य कैद्याचा समावेश आहे. चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेल्याच्या कारणावरून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. या सर्वांना कराची येथून एका वातानुकूलित बसच्या मदतीने वाघा सीमेवर आणण्यात आले होते. सीमा सुरक्षा दलाकडे त्यांना सोपविण्यात आले. पाकिस्तान रेंजर्सच्या एका अधिकार्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, या सर्वांची कागदपत्रे पाहिल्यानंतर त्यांना भारतीय अधिकार्यांकडे सोपविण्यात आले. पाकिस्तानी तुरुंगातून सुटका झालेले मच्छीमार दापू तेज यांनी सांगितले की, ह्यमी मण्यांपासून की चेन तयार करायला शिकलो. बांगड्या, पैंजण आणि हारही मला बनविता येतात. प्रत्येक वस्तूसाठी मला ६० रुपये मिळत होते.’ सात महिन्यांपूर्वी कथितरीत्या पाकिस्तानच्या सागरी सीमेत तेजाच्या नौकेने घुसखोरी केल्याच्या आरोपावरून त्याला ही अटक झाली होती. नौकेवर सात जण होते. मात्र, पाकिस्तान तटरक्षक दलाने केवळ चार जणांनाच अटक केले. (वृत्तसंस्था)