पाकिस्तानला दुसरी दुबई बनवायला चाललेले, ग्वादरने घात केला; स्वप्न भंगल्यात जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:37 IST2025-02-14T15:33:07+5:302025-02-14T15:37:52+5:30
२०२४ च्या फेब्रुवारीमध्ये ३० तास पाऊस पडला. पावसामुळे पर्ण ग्वादर पाण्याने भरले. रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले यामुळे बाकी देशांचा संपर्क तुटला. हा परिसर समुद्र सपाटीपासून जवळ आहे.

पाकिस्तानला दुसरी दुबई बनवायला चाललेले, ग्वादरने घात केला; स्वप्न भंगल्यात जमा
पाकिस्ताननं आधीपासूनच ग्वादरला दुसरी दुबई बनवण्याचं स्वप्न पाहिले होतं. पण, दुबई बनण्याआधीच ग्वादरमध्ये मोठी समस्या तयार झाली आहे. अरबी समुद्राच्या काठावर वसलेले हे क्षेत्र आता पाकिस्तानच्या आर्थिक, पर्यावरणीय आणि राजकीय संकटाचे प्रतीक बनले आहे. चीनच्या सहकार्याने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक असूनही, ग्वादर हा एक अयशस्वी प्रकल्प ठरत आहे, त्या ठिकाणी अजूनही स्थिरता किंवा प्रगती नाही.
PM मोदींसमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला चीनबद्दलचा प्रस्ताव, पण भारताने दिला नकार!
३० तास पाऊस पडल्यामुळे ग्वादरची परिस्थिती बिघडली आहे. हवामान बदल आणि पायाभूत सुविधांची खराब स्थिती या सर्वात मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये, फक्त ३० तासांच्या पावसाने संपूर्ण ग्वादर पाण्याखाली गेले, रस्ते आणि पूल वाहून गेले आणि संपूर्ण परिसर देशाच्या उर्वरित भागापासून तुटला. हा भाग समुद्रसपाटीच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढण्याचा धोका आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात ग्वादरचा मोठा भाग समुद्रात बुडाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
याशिवाय स्थानिक लोकांनीही पाकिस्तान सरकारविरुद्ध बंड केले आहे. बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी चळवळ आधीच मजबूत होती, पण ग्वादर आता या संघर्षाचा नवा बालेकिल्ला बनला आहे. बलुच लिबरेशन आर्मीसारखे दहशतवादी गट दररोज पाकिस्तानी सैन्य आणि सरकारी तळांवर हल्ले करत आहेत. चीनच्या गुंतवणुकीचा स्थानिक लोकांना फायदा झाला नाही कारण नोकऱ्या चिनी कामगार आणि अभियंत्यांना देण्यात आल्या, यामुळे संताप आणखी वाढला.
चीनसोबत संबंध झाले खराब
ग्वादरवरून चीन आणि पाकिस्तानमधील संबंधही बिघडले आहेत. २०१५ मध्ये सुरू झालेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत ग्वादरला आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून विकसित केले जाणार होते, पण वाढत्या अस्थिरता आणि बंडखोरीमुळे चीनची गुंतवणूक आता अडकली आहे. पाकिस्तानने चीनकडून 'न्यूक्लियर ट्रायड' तंत्रज्ञान मागितले, पण चीनने ही मागणी नाकारली, यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला.
आधीच कर्जात अडकलेल्या पाकिस्तानसाठी ग्वादर आता शाप बनला आहे. सीपीईसीमुळे पाकिस्तानने चीनचे मोठे कर्ज घेतले आहे, हे कर्ज आता पाकिस्तान फेडू शकत नाही. अमेरिकेमुळे, आयएमएफ आणि जागतिक बँक देखील पाकिस्तानला जास्त मदत देण्यास कचरत आहेत. ग्वादार आशेचा किरण होता पण आता त्यातही अपयश असल्याचे दिसत आहे.