भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सुधारणार; सौदी अरेबियाचे राजकुमार प्रयत्न करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 04:20 PM2023-08-30T16:20:29+5:302023-08-30T16:21:12+5:30

दिल्लीच्या आधी पाकिस्तानात जाणार सौदीचे राजकुमार, लष्करप्रमुखांना भेटणार

Prince of Saudi Arabia Mohammed bin Salman to improve India Pakistan relations before G20 Summit | भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सुधारणार; सौदी अरेबियाचे राजकुमार प्रयत्न करणार?

भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सुधारणार; सौदी अरेबियाचे राजकुमार प्रयत्न करणार?

googlenewsNext

India Pakistan Relations, Saudi Arabia Prince जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणारे सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आता प्रथम पाकिस्तानला जाणार आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, सौदी राजकुमार 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या छोटाशा दौऱ्यावर येऊ शकतात. या दरम्यान सौदीचे राजकुमार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानातूनच सौदी राजकुमार नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. सौदी राजकुमारांची भारत आणि पाकिस्तानची ही भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा पाकिस्तानी विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भारताशी मैत्रीपूर्ण संबंधी प्रस्थापित करण्याबबत पाकिस्तानवर आखाती देशांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे हा दौरा भारत-पाकिस्तान मधील वैर कमी करण्याच्या दृष्टीने एक पाऊल ठरणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तान दिवाळखोरीच्या संकटात आहे आणि सौदी अरेबिया-यूएईच्या कर्जाच्या आधारे डिफॉल्टपासून वाचला आहे. सौदी अरेबिया आणि यूएई या दोघांनीही आता पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे की ते फुकटात पैसे देणार नाहीत. यामुळेच पाकिस्तानला युएई आणि सौदी अरेबियाला आपल्या राष्ट्रीय मालमत्तेतील हिस्सा विकावा लागला आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानमधील खाणीत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. एवढेच नाही तर ग्वादारमध्ये तेल शुद्धीकरण कारखाना बांधण्यासाठी सौदी अरेबिया सुमारे 3 अब्ज डॉलर्सची मदत देणार आहे.

सौदी आणि यूएईचा पाकिस्तानवर दबाव

यापूर्वी, सौदी अरेबिया आणि यूएईने गरीब पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची मदत दिली, ज्यामुळे IMF कडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनचे पत्रकार कामरान युसूफ यांच्या मते, हे देश आता भारतासोबतचे संबंध सामान्य करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणत आहेत. सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मैत्री सध्या एका नव्या उंचीवर आहे. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या वेळी भारताने सौदी अरेबियाला या संघटनेचे सदस्य बनविण्यास खुले समर्थन केले होते.

पाकिस्तानी पत्रकार रऊफ क्लासरा यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये आता नवाझ शरीफ यांचे सरकार स्थापन होत आहे. नवाझ शरीफ यांना लष्कराचा पाठिंबा असून आता भारतासोबतचे संबंध सुधारण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. नवाझ शरीफ हे सौदी अरेबिया आणि यूएईच्या अगदी जवळचे मानले जातात. यापूर्वी इम्रान खान यांच्या काळात भारतासोबतचे संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पीटीआय नेत्याच्या पक्षांतरामुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता त्याची जबाबदारी नवाझ शरीफ यांच्यावर टाकली जात आहे. नवाझ शरीफ आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध चांगले आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असा समज आहे की, पंतप्रधान मोदींसोबत जर कोणी संबंध सुधारू शकतं तर ते नवाझ शरीफ आहेत. पीएम मोदींनी यापूर्वी पंतप्रधान असताना नवाझ शरीफ यांच्या घरी भेट दिली होती. त्यामुळे आता भारत-पाक मैत्रीच्या दृष्टीने या साऱ्या घटना चांगल्या ठरू शकतात, असे बोलले जात आहे.

Web Title: Prince of Saudi Arabia Mohammed bin Salman to improve India Pakistan relations before G20 Summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.