'आर्थिक प्रगतीसोबतच पर्यावरणाचं रक्षण करणं भारतानं जगाला शिकवलं', अमेरिकेच्या जॉन केरी यांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:41 IST2021-09-13T15:40:30+5:302021-09-13T15:41:13+5:30
John Kerry In India: अमेरिकेचे विशेष राष्ट्रपती दूत (हवामान बदल) जॉन केरी यांनी हवामान प्रदूषण नियंत्रणासाठी भारताचं विशेष कौतुक केलं आहे.

'आर्थिक प्रगतीसोबतच पर्यावरणाचं रक्षण करणं भारतानं जगाला शिकवलं', अमेरिकेच्या जॉन केरी यांचं मत
John Kerry In India: अमेरिकेचे विशेष राष्ट्रपती दूत (हवामान बदल) जॉन केरी यांनी हवामान प्रदूषण नियंत्रणासाठी भारताचं विशेष कौतुक केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एक महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केलं आहे. २०३० सालापर्यंत ४५० गिगावॅट अक्षय्य ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य गाठणं हे जगातील सर्वात शक्तीशाली अक्षय्य ऊर्जा निमिर्तीचं लक्ष्य आहे. यात भारत आतापर्यंत जवळपास १०० गिगावॅट क्षमतेपर्यंत पोहोचला देखील आहे आणि भारताच्या अक्षय्य ऊर्जा निमिर्ती क्षेत्रातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे, असं जॉन केरी म्हणाले. (Special Presidential Envoy for Climate John Kerry praised India meeting with Minister of Power RK Singh)
जॉन केरी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतंच केंद्रीय विद्युत आणि नाविण्य ऊर्जा मंत्री आर.के.सिंह यांच्यासोबत बैठक केली. यात हवामान बदल आणि ऊर्जा निर्मिती स्रोतांबाबत सविस्तर चर्चा झाली. आर्थिक विकास आणि स्वच्छ ऊर्जा या दोन गोष्टी सोबतच चालू शकतात. आर्थिक विकासासोबतच पर्यावरणाचं रक्षण करणं भारतानं जगाला शिकवलं आहे, असं केरी म्हणाले. भारतानं ठेवलेलं ४५० गिगावॅट अक्षय्य ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य नक्की पूर्ण होईल असा विश्वास असल्याचंही ते म्हणाले.
भारतासोबत करार करण्यास उत्सुक
आर्थिक विकासात जबरदस्त कामगिरी करण्याची धमक ठेवण्यात भारत एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम उदाहरण आहे आणि स्वच्छ ऊर्जेला कोणताही पर्याय नाही. भारतानं या दोन्ही गोष्टींचा उत्तम मेळ साधला आहे. ग्लासगोमध्ये योग्य श्रेय दिलं जाईल अशी आशा आहे, असं केरी म्हणाले. भारत-अमेरिका यांच्यात आज क्लायमेट अॅक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉगची घोषणा करत आहोत. भारतासोबत करारबद्ध होण्यास आम्ही उत्सुक आहोत, असंही केरी म्हणाले.
संपूर्ण जगाला कोरोना विरोधी लसीचा पुरवठ्याकरण्यासोबतच इतर अनेक मुद्द्यांवर भारताची जागतिक पातळीवरील भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. भारतानं अनेक देशांना लस पोहोचविण्याचं काम केलं आहे. हवामानाच्या बाबतीतही भारत वेगानं काम करत आहे याबाबत मी त्यांचे विशेष आभार मानतो, असं केरी यांनी यावेळी म्हटलं आहे.