आठ शांतिरक्षकांना युनोचे मरणोत्तर पदक
By admin | Published: May 25, 2014 11:19 PM2014-05-25T23:19:36+5:302014-05-25T23:19:36+5:30
संयुक्त राष्ट्राच्या शांतिपथकात काम करताना मृत्यू पावलेल्या ८ भारतीय शांतिसैनिकांचा त्यांनी दाखविलेले शौर्य व त्याग यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे प्रतिष्ठेचे पदक देऊन मरणोत्तर सत्कार करण्यात येणार आहे
संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राच्या शांतिपथकात काम करताना मृत्यू पावलेल्या ८ भारतीय शांतिसैनिकांचा त्यांनी दाखविलेले शौर्य व त्याग यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे प्रतिष्ठेचे पदक देऊन मरणोत्तर सत्कार करण्यात येणार आहे. कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या १०६ सैनिक, पोलीस व नागरिकांना हा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. संयुक्त राष्टÑाचे दुसरे सरचिटणीस डॅग हॅमरस्कजोल्ड यांच्या नावाचे पदक २९ मे रोजी दिले जाईल. २९ मे हा दिवस शांतिपथक दिन म्हणून पाळला जातो. हा पुरस्कार मिळविणार्या भारतीय शांतिसैनिकांत लेफ्ट. कर्नल महिपालसिंग, लान्सनाईक नंदकिशोर जोशी, हवालदार हिरालाल, नायब सुभेदार शिवकुमार पाल व हवालदार भारत सासमल यांचा समावेश आहे. दक्षिण सुदान येथे शांतिपथकाचे सैनिक म्हणून काम करत असताना २०० हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले. सुभेदार धर्मेश संगवान व सुभेदार कुमारपाल सिंग हे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अकोबो येथे झालेल्या हल्ल्यात मारले गेले होते. कांगोमध्ये तैनात असलेला शिपाई रामेश्वरसिंग फेब्रुवारी २०१३ मध्ये शहीद झाला होता. संयुक्त राष्टÑाच्या मुख्य कार्यालयात शांतिदिनानिमित्त शांतिसैनिकांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)