युनोकडे कागाळी

By admin | Published: September 26, 2015 03:30 AM2015-09-26T03:30:22+5:302015-09-26T03:30:22+5:30

नियंत्रण रेषेवर भिंत बांधण्याची भारताची योजना असल्याची तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे (युनो) केली आहे. नियंत्रण रेषेवर भिंत उभारणे युनोच्या ठरावाविरुद्ध असून

Yunokde Kagali | युनोकडे कागाळी

युनोकडे कागाळी

Next

संयुक्त राष्ट्र/न्यू यॉर्क : नियंत्रण रेषेवर भिंत बांधण्याची भारताची योजना असल्याची तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे (युनो) केली आहे. नियंत्रण रेषेवर भिंत उभारणे युनोच्या ठरावाविरुद्ध असून, असे करून नियंत्रण रेषेलाच आंतरराष्ट्रीय सीमेत रूपांतरित करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचा दावाही पाकने केला आहे.
दरम्यान, भारताने याला आपण योग्य वेळी उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाकच्या या पत्रप्रपंचाने युनोच्या आमसभेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची स्वतंत्र बैठक
होण्याची शक्यता धूसर झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पंतप्रधान येथील वाल्डोर्फ एस्टोरिया या एकाच हॉटेलमध्ये मुक्कामास आहेत. पण युनोच्या आमसभेत दोघांचीही तोंडे दोन दिशांना राहण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
------
संयुक्त राष्ट्रातील पाकच्या राजदूत मलीहा लोधी यांनी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष रशियन राजदूत विताली चुर्किन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानदरम्यानच्या १९७ कि.मी. लांबीच्या ताबारेषेवर १० मीटर उंच आणि १३५ फूट रुंद भिंत बांधण्याचे भारताचे मनसुबे असून, पाक त्याबाबत चिंतित आहे. या क्षेत्रात कोणताही भौतिक बदल घडवून आणणारे बांधकाम हे सुरक्षा परिषदेच्या १९४८मधील प्रस्तावाचे उल्लंघन ठरेल, असे पाक मानतो.
------
1 भिंत बांधण्याबाबतच्या आरोपावर भारताने लगेचच थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, लोधी यांनी ४ आणि ९ सप्टेंबरला पाठविलेल्या या पत्रातील मजकुरातच विरोधाभास असल्याचे म्हटले आहे.
2शिवाय पाकिस्तानने सुरक्षा परिषदेला दिलेल्या पत्रांपैकी एक पत्र हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सईल सलाउद्दीन याच्या वक्तव्यावर आधारलेले असल्याकडे भारताने नेमकेपणाने लक्ष वेधले आहे. हे पत्र सलाउद्दीनच्या वक्तव्यावर आधारलेले आहे.
3 दुसरे पत्र ४ सप्टेंबरला लिहिले असून, त्यात द्विपक्षीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये आधीच बैठक झालेली आहे. त्यामुळे या पत्राला काहीही अर्थ नाही, याउपर संयुक्त राष्ट्राने काही पाऊल उचललेच, तर भारत योग्यरीत्या उत्तर देईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.
-------------
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेतील ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यास भारत त्याला प्रत्युत्तर देईल, असेही स्वरूप यांनी स्पष्ट केले. शरीफ यांनी गेल्या वर्षीही युनोच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा मांडला होता त्याला पंतप्रधान मोदी यांनी जोरदार विरोध केला होता.

Web Title: Yunokde Kagali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.