जुन्या वादातून बेदम मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:55 PM2019-06-10T13:55:18+5:302019-06-10T14:15:30+5:30
खुन झाल्यानंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
जालना : जुन्या वादातून जालना येथील लोदी मोहल्ला परिसरात रविवारी रात्री १७ वर्षीय युवकाला जमावाने बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. रोहित जाधव (१७) असे मयताचे नाव आहे.
याप्रकरणी मयत तरुणांच्या आईच्या फिर्यादीवरुन सोमवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात २० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आठ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही मारहाण जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खुन झाल्यानंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात प्रचंड वाढ केली आहे.
रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कुंडलिका नदीत पडलेले घर पाहण्यासाठी येत असताना सोन्या उर्फ रोहित यास जमावाने एका नाल्यात गाठून बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर झालेल्या सोन्याचा जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अर्धा तासात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी मयताची आई सगिता नारायण जाधव (४०) यांच्या फिर्यादीवरुन २० जणांविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.