शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:11 PM2024-09-04T15:11:25+5:302024-09-04T15:16:20+5:30

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

"Don't worry, any how we will get compensation from government "; Manoj Jarange's appeal to farmers | शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

वडीगोद्री ( जालना): "शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वेदना आहेत, त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पण काळजी करू नका, नुकसान भरपाई यांच्या छाताडावर बसून घेणार आहे." असे आश्वासन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले. शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितले की, "आज जितके शक्य आहे, तितके मी फिरणार आहे. मी राजकारणी नाही की दौरा लिहून घेईन, जे रस्त्यात दिसेल त्या नुकसानीची मी पाहणी करणार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळवणार."

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची स्वत: पाहणी करून मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचवणार, असे जरांगे म्हणाले. त्यांनी अंतरवाली सराटी येतहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

जरांगे पाटील यांनी सरकारकडे तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. "निसर्गाने शेतकऱ्यांशी दगा फटका केला आहे, परंतु सरकारने दगा करू नये. सरकारने जर शेतकऱ्यांना वेठीस धरलं, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलताना, जरांगे पाटील म्हणाले, "एसटी कर्मचारी पाठीमागच्या सरकारपासून हाल सोसत आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही त्यांच्या समस्या सुटत नाहीत. एसटी कर्मचारी जनतेची सेवा करतो, त्याच्या मागण्या का मान्य होऊ नयेत? त्यालाही संसार आहे, पण सरकार त्याचा संसार डुबवायला लागले आहे."

जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, "एसटी कर्मचाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर सरकारचा कार्यक्रम संपवणार. फडणवीस यांनी आंदोलनांमध्ये पेरलेले लोक आता समस्यांना वाढवण्याचे काम करत आहेत."

शिक्षकांचे प्रश्न, डॉक्टरांचे प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न, बारा बलुतेदारांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. "आता लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झालीच पाहिजे, नाहीतर हा संघर्ष थांबणार नाही," असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांना सरकारसमोर मांडण्याचे आणि त्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास संघर्षाला पुढे नेण्याचे इशारा दिला आहे.

Web Title: "Don't worry, any how we will get compensation from government "; Manoj Jarange's appeal to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.