सरकारच्या धोरणा विरोधात कामगार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:11 IST2019-01-09T00:10:36+5:302019-01-09T00:11:26+5:30
सरकार उपाय योजना करण्याएैवजी केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचा आरोप कामगार नेते अण्णा सावंत यांनी मोर्चानंतर आयोजित सभेत केला.

सरकारच्या धोरणा विरोधात कामगार रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे
कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे. एकूणच शेतमजूर हाताला काम नसल्याने हवालदिल असून, शहरातील बेरोजगारांवरही बेकारीची कु-हाड कोसळली आहे. असे असताना सरकार त्यावर उपाय योजना करण्याएैवजी केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचा आरोप कामगार नेते अण्णा सावंत यांनी मोर्चानंतर आयोजित सभेत केला.
यावेळी गांधी चमन येथून हा मोर्चा सकाळी काढण्यात आला. गांधीचमन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रीकरण करून भाववाढ रोखणे, रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाय योजना करणे, ग्रामीण आणि शहरी भागात किमान वेतन मिळेल अशी हमी देणे, कामगार कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे, सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार शिजविणा-या कर्मचा-यांना सरकारी नोकरीत घेऊन महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांचा समावेश होता. या मोर्चात अण्णा सावंत, मधुकर मोकळे, गोविंद आर्दड, साजेदा बेगम, कांता मिटकरी, मधुरा रत्नपारखे, हरिश्चंद्र लोखंडे, मंगल नरंगळे आदींसह अन्य कर्मचा-यांची उपस्थिती होती.