चोऱ्या, घरफोड्या रोखण्यासाठी रिक्षांवर पोस्टरची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:22+5:302021-07-04T04:12:22+5:30
अमळनेर : चोऱ्या, दरोडो रोखण्याचे काम पोलिसांचे असले तरी एक सुजाण नागरिक म्हणून दक्ष राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ...
अमळनेर : चोऱ्या, दरोडो रोखण्याचे काम पोलिसांचे असले तरी एक सुजाण नागरिक म्हणून दक्ष राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. म्हणून चोऱ्या, दरोडा पडण्याआधीच कोणती आणि कशी काळजी घ्यावी, याविषयी अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोस्टर तयार करून रिक्षांवर लावून जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नागरिकांकडून उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या काळात घरफोड्या, चोऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांनी जनतेला विश्वासात न घेतल्याने गुन्ह्यांची अधिकची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. परंतु नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक जयापाल हिरे यांनी नागरिकांना विश्वासात घेत गुन्हेगारीवर वचक निर्माण जनजागृतीचे एक विधायक पाऊल उचलले आहे. यासाठी शैलेश महिंद यांचे सहकार्य लाभले. यावेळी पोलीस नाईक शरद पाटील, शैलेश महिंद, रिक्षाचालक, मालकासह नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी....
कोणतीही मोठी चोरी होण्याअगोदर त्या घराची वा दुकानाची चोरट्याकडून दिवसा रेकी, पाहणी केली जाते. त्यामुळे कॉलनीत येणारे फेरीवाले यांना स्टेशनला माहिती दिली आहे काय, याबाबत विचारणा करावी.
तसेच पोलीस स्टेशनला नोंद न करता विक्रीसाठी येणाऱ्या फेरीवाल्यांना मनाई करावी. दिवसा घरास कुलूप असल्याचे पाहून रात्री चोरटे चोरी करतात.
म्हणून बाहेरून घर बंद आहे की नाही, हे समजणार नाही, याप्रकारे सेफ्टी डोअर बसवावे.
नागरिकांनी बाहेरगावी जाताना रोख रक्कम व मौल्यवान दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवावे. कारण चोरटे घरात प्रवेश केल्यावर सर्वात आधी कपाट तोडतात तेव्हा बाहेरगावी जाताना लॉकरमध्ये दागिने ठेवणे शक्य नसल्यास मौल्यवान वस्तू कपाटाऐवजी अशा ठिकाणी ठेवाव्यात की चोरट्यांना सहज सापडणार नाहीत.
सामूहिक वर्गणीतून सीसीटीव्ही बसवा...
नवीन कॉलनीत राहणाऱ्या रहिवाशांनी कॉलनीतील मुख्य रस्त्यांवर सामूहिक वर्गणीतून सीसीटीव्ही कॅमरे लावावेत. घराच्या वा दुकानाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावताना मुख्य रस्त्याच्या ५० मीटर भाग दोन्ही बाजूने येईल याप्रमाणे कॅमेरे लावावेत.
कारण चोरटे वाहन ५० फुटांवर उभे करतात. रस्त्यावरील कॅमेऱ्यांमुळे चोर किती होते, कोणत्या वाहनाने आले, कोणत्या दिशेला गेले, बाहेर किती चोरटे थांबले होते, ही माहिती पोलिसांना मिळून गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता वाढते. ज्या कॉलनीत, गल्लीत, चौकात मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्या भागात चोरी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तसेच वाहनेही सुरक्षित राहतात.
पथदिवे सुरू ठेवावेत...
बऱ्याच गल्लीत, कॉलनीत रात्री अंधार असतो. याचा फायदा चोरटे घेतात, तेव्हा नगरपालिका वा ग्रामपंचायत यांच्यावर विसंबून न राहता प्रत्येकाने घराबाहेरील वीज रात्री सुरू ठेवावी वा सार्वजनिक पथदिवे सुरळीत चालू आहेत की नाही, याची वेळोवेळी खात्री करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.
030721\03jal_2_03072021_12.jpg
रिक्षांवर पोस्टर लावून जनजागृती करताना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सोबत पोलीस नाईक शरद पाटील, शैलेश महिंद. (छाया : अंबिका फोटो)