अखेर दोन महिन्यांनी झाला बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:22+5:302021-07-07T04:21:22+5:30
जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला प्रलंबित राहत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा ...
जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला प्रलंबित राहत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मे व जून महिन्याच्या पगारासाठी या कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात आंदोलन केल्यानंतर मे महिन्याचा पगार नुकताच देण्यात आला आहे. दर महिन्याला या कर्मचाऱ्यांना पगारासाठी प्रशासनाविरोधात आंदोलन करावे लागत आहे.
बीएसएनएलच्या जळगाव विभागात सध्या दीडशे कर्मचारी कार्यरत आहेत. २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेत (व्हीआरएस) चारशेेहून अधिक कर्मचाऱ्यांनी सेवा समाप्त केली होती. तेव्हापासून उर्वरित कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला पगार हा विलंबाने होत आहे. दोन वर्षांपासून दर दोन ते तीन महिन्यांचे पगार रखडत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना पगारासाठी वारंवार आंदोलने करावी लागत आहेत. तर आंदोलन केल्यावरच प्रशासनाकडून दोन ते तीन दिवसानंतर रखडलेले पगार करण्यात येत असल्याचेही कर्मचाऱ्यांमधून सांगण्यात आले.
इन्फो :
बीएसएनएलमधील नियोजनशून्य प्रशासन व्यवस्थेतील सावळ्या गोंधळामुळे दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार विलंबाने होत आहेत. पगारासाठी दर महिन्याला आंदोलने करावी लागत आहेत. बीएसएनएलकडून कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार आहे.
नीलेश काळे, जिल्हा सचिव, बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन, जळगाव