मुंबईहून विमान पोहचले जळगावात तब्बल ३ तास उशिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 19:47 IST2018-04-24T19:47:58+5:302018-04-24T19:47:58+5:30
पहिल्याच दिवशी झाली प्रवाशांची प्रचंड गैरसोय

मुंबईहून विमान पोहचले जळगावात तब्बल ३ तास उशिरा
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२४ : गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली जळगाव-मुंबई विमानसेवा शुक्रवार, २० एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. मात्र मुंबईहून येणारे विमान पहिल्या दिवसापासून उशिरा येत आहे. मंगळवारीही तब्बल तीन तास उशिराने म्हणजे दुपारी १२.१५ वाजता हे विमान जळगावला पोहोचले. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने म्हणजेच १२.३० वाजता मुंबईकडे रवाना झाले.
कंपनीने वेबसाईटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबईहून सकाळी ७.४० वाजता निघालेले विमान जळगावला ९.१५ ला पोहोचेल, तर जळगावहून मंगळवार, बुधवार व गुरुवार असे तीन दिवस सकाळी ११.०५ वाजता निघून दुपारी १२.४५ वाजता मुंबईला पोहोचणार आहे. तर शुक्रवार, शनिवार व रविवार असे आठवड्यातील तीन दिवस दुपारी २.३० वाजता जळगावहून प्रवासी घेऊन हे विमान मुंबईला दुपारी ४.०५ ला पोहोचेल.
२० एप्रिलपासून पुन्हा विमानसेवा सुरू झाली. त्या पहिल्याच दिवशी मुंबईहून विमान सुमारे पावणेचार तास उशिरा पोहोचले. तर मंगळवारी तीन तास उशिराने म्हणजे १२.१५ वाजता हे विमान जळगावला पोहोचले. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची तर गैरसोय झालीच, शिवाय जळगावहून मुंबईला ११.०५ला हे विमान निघणार असल्याने ते प्रवासीही जळगाव विमानतळावर येऊन थांबले होते. त्यांनाही दीड तास ताटकळावे लागले. दुपारी १२.३० वाजता हे विमान प्रवासी घेऊन मुंबईला रवाना झाले.