हिरवाईने नटले आहे गौताळा अभयारण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 15:42 IST2020-08-08T15:42:14+5:302020-08-08T15:42:20+5:30
संजय सोनार चाळीसगाव: परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे तालुक्याचे पर्यटन वैभव असलेले गौताळा अभयारण्य हिरवेगार झाले आहे. तेथील धवलतीर्थ धबधबा ...

हिरवाईने नटले आहे गौताळा अभयारण्य
संजय सोनार
चाळीसगाव: परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे तालुक्याचे पर्यटन वैभव असलेले गौताळा अभयारण्य हिरवेगार झाले आहे. तेथील धवलतीर्थ धबधबा ओसांडून वाहत आहे. दरवर्षी पर्यटक, भाविक येथील निसर्ग सौदर्याचा सुखद अनुभव घेण्यासाठी ार्दी करतात. मात्र यंदा कोरोनाने पर्यटक तसेच भाविकांच्या वन सफरीच्या इराद्यावर पाणी ओतले गेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक फैलावू नये म्हणून पाटणासह गौताळाचे दर्शन दुरापास्त झाले आहे.
खान्देशचा लोणावळा म्हणून पाटणा देवीचा निसर्गरम्य परीसर प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यापासूूून २० किलोमीटर अंतरावर असलेले गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. या अभयारण्यात बिबटया, काळवीट, नीलगाय असे अनेक प्राणी प्रामुख्राने आढळतात तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती देखील आहे. पाटणदेवी, केदारकुंड धबधब्यासह येथील वन्यजीव हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. विशेषत: शनिवारी, रविवारी रेथे अधिक गर्दी होत असते.
पाणटणादेवी येथे वर्षभर येतात भक्त
पाटणादेवी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ति चंडिकादेवीची मूर्ती आहे. या ठिकाणी पूजा साहित्य आदी विक्रेत्यांना रोगारही उपलब्ध झाला आहे, मात्र सध्या त्यांचा रोजगार हिरावला आहे.
खान्देशचा लोणावळा
गत चार महिन्यापासून कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका गौताळा व पाटणादेवीलाही बसला आहे. चार महिन्यापासून पर्यटकांना तसेच भाविकांना गौताळासह पाटणादेवी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांसह भाविकांचा मोठा हिरमोड झाला आहे. पावसाळ्यात तर गौताळ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. खान्देशचे जणू लोणावळच भासते.
जळगाव व औरंगाबदच्या सीमेवर आहे अभयारण्य
गौताळा अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे. .गौताळा औटराम घाट अभयारण्य कन्नड गावापासून १५ कि.मी अंतरावर आहे तर चाळीसगाव पासून २० कि.मी अंतरावर आहे. औरंगाबादपासून कन्नड ६५ कि.मी अंतरावर आहे. हाच रस्ता पुढे चाळीसगावला जातो. कन्नडहून २ कि.मी पुढे गेल्यानंतर एक फाटा लागतो. या फाटयाने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ जातो. अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडुनिंब, चिंच असे वृक्ष आहेत तर तळ्यात पाणडुबा, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्गाचे सुंदर दर्शन घडते.
५४ प्रजातीचे प्राणी
अभयारण्यात बिबटया, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर यासह इतर ५४ प्रजातींचे प्राणी तर २३० प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.
विविध स्थळांची भुरळ
प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्यांची कुटी, पुरातन मंदिरे, लेणी, महादेव मंदिर, हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर, केदारकूंड, सीताखोरे आणि धवल तीर्थ धबधबा अशा विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाºया पर्यटकांची संख्या मोठी असते.
सातमाळ्याचा दिसतो डोंगर
गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो. या डोंगरातून नागद नदी उगम पावते. ती उजवीकडे भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलिकडे मांजरमाळ डोंगर दिसतो.