गाळेधारकांना मनपाने बजावली नुकसानभरपाईची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:49+5:302021-07-07T04:20:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील अडीच हजार गाळेधारकांना मनपा प्रशासनाकडून गेल्या ९ वर्षांपासून थकीत भाड्यापोटीची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील अडीच हजार गाळेधारकांना मनपा प्रशासनाकडून गेल्या ९ वर्षांपासून थकीत भाड्यापोटीची रक्कम वसूल करण्याबाबत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्यासाठी आतापर्यंत चौथ्यांदा नुकसानभरपाईच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम अद्यापही भरलेली नाही.
गाळेधारकांबाबत मनपा प्रशासनाने मे महिन्यात झालेल्या महासभेत भाडे न भरणाऱ्या व मुदत संपलेल्या गाळेधारकांवर करवाईसाठी धोरण निश्चित केले आहे. मात्र, मनपाकडून अजूनही गाळेधारकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरीकडे आता मनपाकडून गाळे नूतनीकरण करण्यासाठी पात्र ठरलेल्या गाळेधारकांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्याआधी मनपाने गाळेधारकांना नुकसानभरपाईची रक्कम भरण्याबाबत पुन्हा एकदा नोटिसा बजाविल्या आहेत.
थकबाकी ‘नील’ असेल तरच नूतनीकरणास ठरणार पात्र
मनपाने नव्याने निश्चित केलेल्या धोरणानुसार गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरल्याशिवाय पर्याय नाही. थकबाकीची रक्कम भरलेले गाळेधारकच नूतनीकरणासाठी पात्र ठरू शकतात. ज्या गाळेधारकांनी मनपाची थकबाकीची रक्कम भरली नाही, असे गाळेधारक पात्र ठरणार नसून, मनपाकडून या गाळेधारकांचे गाळे जप्त करून, ते लिलाव करण्याचे धोरण याआधीच महासभेत मंजूर झाले आहे.
२५० कोटींची थकीत रक्कम, १२० कोटींची झाली वसुली
मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून मनपा प्रशासनाने आतापर्यंत १२० कोटी रुपयांची वसुली केली आहे. मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्या काळात ही वसुली झाली होती, तर किशोर राजे निंबाळकर यांच्या काळात देखील २२ कोटींची वसुली झाली होती. मात्र, त्यानंतर अद्यापही मनपा प्रशासनाला गाळेधारकांकडून वसुली करता आलेली नाही. आता मनपाने पुन्हा गाळेधारकांना २५० कोटी रुपयांच्या वसुलीबाबत नुकसानभरपाईच्या नोटिसा दिल्या आहेत.