पिकांच्या भवितव्यासाठी ‘पायलट’ होणार शेतकऱ्यांचे मित्र! ड्रोनद्वारे औषध फवारणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:47 IST2023-04-25T17:46:01+5:302023-04-25T17:47:15+5:30
...त्यामुळे प्रत्येक हंगामातील पिकांचे भवितव्य आता ड्रोनच्या पायलटच्या हाती असणार आहे आणि हाच पायलट आता शेतकऱ्यांचा जीवलग मित्र ठरणार आहे.

पिकांच्या भवितव्यासाठी ‘पायलट’ होणार शेतकऱ्यांचे मित्र! ड्रोनद्वारे औषध फवारणी
कुंदन पाटील -
जळगाव : पिकांवर ‘ड्रोन’द्वारे औषध फवारणी करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने १० पिकांसाठी मसुदा जाहीर केला आहे.त्यात कापसाचाही समावेश आहे.औषधांची फवारणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी मान्यता दिलेला पायलट आणि ड्रोनचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामातील पिकांचे भवितव्य आता ड्रोनच्या पायलटच्या हाती असणार आहे आणि हाच पायलट आता शेतकऱ्यांचा जीवलग मित्र ठरणार आहे.
गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याहस्ते १० पिकांसाठी तयार करण्यात आलेल्या ड्रोनद्वारे औषध फवारणीचा मसुदा प्रकाशित करण्यात आला. त्यात कापूस, सोयाबीन, ऊस, गहू, भात, मका, भुईमूग, तूर, करडई, तीळ या दहा पिकांचा समावेश आहे. या पिकांवर ड्रोनद्वारे औषधांची फवारणी करण्याची कार्यपद्धती निश्चीत करण्यात आली आहे.तसेच ड्रोनद्वारे फवारणी करताना पायलटवर जबाबदारीही निश्चीत करण्यात आली आहे. या फवारणीसाठी प्रमाणित औषधांचीच फवारणी करता येणार आहे.
या मसुद्याच्या निश्चीतसाठी देशभरातील तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातून परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.इंद्रमणी, राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.सुनील गोरंटीवार यांचा समावेश होता.
पर्यावरणाचेही रक्षण
ड्रोनद्वारे फवारणी करताना शिवारातील किडी आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, यासाठी फवारणीचा भाग निश्चीत करावा लागणार आहे.तसेच प्राथमिक उपचार साधनेही उपलब्ध ठेवावी लागणार आहेत.ड्रोन उडविण्याची पद्धत आणि उंचीही निश्चीत करण्यात आली आहे. सकाळी किंवा सायंकाळी ड्रोनद्वारे केलेली औषध फवारणी लाभदायी ठरते, अशी शिफारसही या समितीने केली आहे.
रोजगाराची संधी
दरम्यान, देशभरातील शेती व्यवसायात फवारणीसाठी प्रशिक्षीत पायलट आवश्यक असणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या क्षेत्रात पाऊल टाकताना त्यांना मात्र तांत्रिक, कृषी कौशल्य अवगत करावे लागणार आहे.