वीज पुरवठ्याची समस्या पिकांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:10 IST2018-10-02T00:04:19+5:302018-10-02T00:10:06+5:30
भडगाव तालुक्यातील महिंदळेसह परिसरात वीज पुरवठा समस्येने उग्र स्वरुप धारण केले असून विहिरींना पाणी असतांनाही विजेअभावी ते पिकांंना देता येत नाही. त्यामुळे कापूस पिकावर संकट घोंघावू लागले आहे.

वीज पुरवठ्याची समस्या पिकांच्या मुळावर
महिंदळे ता. भडगाव : महिंदळेसह परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन ते तीन दमदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील विहीरींना ब-यापैकी पाणी आहे. त्यामुळे परिसरात आजपर्यंत ज्वारी, बाजरी व कडधान्ये वगळता कपासी पिक जोमात आहे . परंतु विजेच्या लपंडावामुळे उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती जाणवत असतांंना महिंदळे परिसरातील विहीरींना आजही ब-यापैकी पाणी आहे . परंतु विजेचा लपंडाव पाहता हा परिसरही संकटात येऊ शकतो, असे बोलले जात आहे.
येथे सिंचनासाठी आठ तास वीज पुरवठा दिल्याचे सांगितले जाते, पण आठ तासात एक तासही वीज सुरळीत चालत नाही. परिणामी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. ऐन बहरात आलेली पिके पाण्याअभावी डोळ्यासमोर मरणासन्न अवस्थेत उन्हांच्या झळा सहन करत आहेत.
कमी दाबाचा वीज पुरवठा
परिसरात भाद्रपदाचे कडक ऊन पडत आहे. उन्हाच्या तिव्रतेने पिकांची लाही लाही होत आहे. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करतांना दिसत आहेत. रात्री जिवाची पर्वा न करता पिकांना पाणी देण्यासाठी जातात. परंतु विजेचा लपंडाव व कमी दाबाचा पुरवठा यात पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक शेतक-यांचे पंप आजपर्यंत कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे जळाले आहेत. आणि निकामी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने डिझेल इंजिनचा सहारा घेत आहेत, परंतु डिझेलचेही भाव वाढल्यामुळे हे परवडणारे नाही. त्यामुळे पिके जगवायची कशी असा पेच शेतकºयांना पडला आहे.
‘लाल्या’ रोग काढतोय डोके वर
परिसरात कापूस पिक जोमात असतांना भाद्रपदाच्या उन्हांची तीव्रता वाढत असल्याने व पाणी कमी असल्यामुळे कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण होताना दिसत आहे. जणू काही ‘दुष्काळात तेरावा महिना‘ अशी स्थिती अनुवभास येत आहे. अतोनात पैसा पिकांसाठी खर्च झाला आहे. त्यात वीज वितरणाचा कारभार शेतक-यांच्या मुळावर उठले आहे. दिवसभर विजेचा लपंडाव व कमी दाबाचा विज पुरवठ्यामुळे पिके कशी वाचतील या विवंचनेत शेतकरी आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे तर दुसरीकडे पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरातील वीज समस्या त्वरीत सोडवावी व पिकांना जीवदान द्यावे, वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.