एमआयडीसीत मियावाकी तंत्राचा वापर करीत वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:42+5:302021-07-07T04:20:42+5:30
आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लघुउद्योग भारती आणि वन्यजीव संरक्षण संस्थेने शहरातील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात २६ ...
आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लघुउद्योग भारती आणि वन्यजीव संरक्षण संस्थेने शहरातील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात २६ विविध देशी प्रजातींच्या तीन हजार झाडांची लागवड केली आहे. ही झाडे फक्त तीन फूट अंतर सोडून मियावाकी पद्धतीने लावण्यात आली आहेत. यावेळी लघुउद्योग भारतीचे रवींद्र फालक आणि एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एम. एस. पाटील उपस्थित होते.
मियावाकी पद्धतीने लावल्याने झाडे एकमेकांशी स्पर्धा करून वेगाने वाढतात. त्यामुळे जे जंगल तयार होण्यास २० ते २५ वर्षे लागतात. या पद्धतीमुळे त्यासाठी फक्त ५ ते ७ वर्षे लागतात.
शहरात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने नेहमीच विविध परिसरांत झाडे लावली जातात. मात्र, औद्योगिक वसाहतीच्या परिसरात देखील अशाच पद्धतीने झाडे लावली जावीत. यासाठी औद्योगिक वसाहतीतील परिसर निवडण्यात आला. तेथे जांभूळ, काशिद, कडुनिंब यांसारख्या विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
काय आहे मियावाकी संकल्पना
मियावाकी ही जपानी पद्धत आहे. ग्रीन झोन बनवण्यात ती उपयुक्त ठरते. याला ऑक्सिजन पार्क देखील म्हटले जाऊ शकते. कमी अंतरावर झाडे लावल्याने जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन लवकर होत नाही. त्यामुळे ओल टिकते आणि जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होते. तसेच वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली जातात. जशी झाडे जंगलात असतात.
जिल्ह्यात या आधीही मियावाकी तंत्राचा वापर
जिल्ह्यात या आधीही काही ठिकाणी मियावाकी तंत्राचा वापर करण्यात आला आहे. शिरसोली परिसरात एका ठिकाणी तर अमळनेर तालुक्यात हिंगोणे बुद्रुक येथे दोन हजार झाडे मियावाकी तंत्राने लावली आहेत. तसेच १ हजार झाडे दहिवदला मियावाकी तंत्राने लावण्यात आली आहेत.
कोट - जिल्ह्यात या आधी असे प्रयोग करण्यात आले आहेत. त्यासोबतच आम्ही जळगाव औद्योगिक वसाहतीत हा प्रयोग केला आहे. कमी अंतरात झाडे लावल्याने झाडांची वाढ वेगाने होते. कमी अंतरातील झाडांमुळे जमिनीची धूप कमी होते. तसेच झाडांच्या जास्त संख्येने ऑक्सिजन देखील मोठ्या प्रमाणात तयार होतो.
- रवींद्र फालक