भर पावसाळ्यातही भुसावळात टँकरने पाणीपुरवठा
By admin | Published: June 14, 2017 12:42 PM2017-06-14T12:42:06+5:302017-06-14T12:42:06+5:30
गोलाणी परीसर आणि साकरी फाटा या भागाला भर पावसाळ्यात सुद्धा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची स्थिती आहे.
ऑनलाईन लोकमत / पंढरीनाथ गवळी
भुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - शहराजवळील कंडारी या गावासह आशिया महामार्गावरील गोलाणी परीसर आणि साकरी फाटा या भागाला भर पावसाळ्यात सुद्धा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची स्थिती आहे. पुरेसा पाऊस न आल्यास अशीच स्थिती राहील, असे पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता एस. पी. लोखंडे यांनी सांगितले.
दरम्यान, या भागाला होणारा पाणीपुरवठा हा शहरातील नगरपालिका मालकीच्या विहिरीवरुन केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
12 हजार लीटर क्षमतेच्या प्रत्येकी एका टँकरच्या दोन फे:या या भागासाठी केल्या जात आहेत.
तालुक्यातील टहाकळी, शिंदी, गोंभी खेडी-चोरवड या गावांमधील पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक-एक विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे. त्यावरुन गावांना पाणी पुरवठा सुरू आहे, असे लोखंडे यांनी सांगितले. कन्हाळे बुद्रुक येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी दोन विंधन विहीरी मंजुरीसाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तालुक्यातील कन्हाळे खुर्दला देखील एक विहीर अधिग्रहीत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शहराजवळील खडका येथील विस्तारीत भागासाठी पाच लाख रुपये अंदाजित खर्चाची तातडीची पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे.
टंचाई आराखडय़ात नसलेल्या शिंदी आणि खंडाळे येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून वेल्हाळे तलावातून पाणी पुरवठा करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. त्या प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या दोन्ही गावांना वेल्हाळे तलावातून पाणी पुरवठा केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत
यावर्षी प्रथमच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत भुसावळ तालुक्यातील खंडाळे आणि शिंदी या दोन गावांना या योजने अंतर्गत पाणी पुरवठा केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. या योजने अंतर्गत भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील तलावाच्या काठावर दोन ठिकाणी विहीरी खोदण्यात येणार आहेत.त्यातून पीव्हीसी पाईल लाईन टाकून या दोन गावांमधील विहिरीत पाणी सोडून ते गावांना पुरविण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
मंत्रालयात प्रस्ताव सादर
भुसावळ तालुक्यातील खंडाळे व शिंदी या गावांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयात सादर झाला आहे.त्याला मंजुरी मिळाली नाही. मंजुरी मिळाल्यावर लागलीच कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. ही योजना महत्त्वाकांक्षी आहे. वेल्हाळे ते खंडाळे आणि शिंदी या गावांना पीव्हीसी पाईप लाईन वेल्हाळे तलाव ते शिंदी व खंडाळे अशी या क्रॉस कंट्री पद्धतीने पाईप लाईन अंथरुन पाणी पुरवठा केला जाईल.
76 लाखाची योजना
वेल्हाळे तलावावरुन शिंदी या सुमारे 2000 हजार लोकसंख्येच्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना ही सुमारे 76 लाख रुपये इतक्या खर्चाची आहे.यात तलावाजवळ विहिर आणि विहिरीपासून गावा र्पयत पीव्हीसी पाईप लाईन अंथरुन त्याद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे.
मोंढाळ्यासाठी 64 लाख
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत भुसावळ तालुक्यातील खंडाळे या गावाचाही समावेश करण्यात आला आहे.या गावाची लोकसंख्या सुमारे 1 हजार 200 इतकी आहे.या गावातील पाण्याच्या टाकीत वेल्हाळे तलावावरुन पीव्हीसी पाईप लाईनद्वारे पाणी वाहून आणून त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. खंडाळे गावासाठीची ही योजना 64 लाख रुपये इतक्या किमतीची असल्याची माहिती अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली आहे.