कुजबूज ग्रामीण भागातील रस्ते तरी बरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:24+5:302021-07-07T04:21:24+5:30
ग्रामीण भागातील रस्ते तरी बरे! शहरात गेल्या दोन वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरू ...
ग्रामीण भागातील रस्ते तरी बरे!
शहरात गेल्या दोन वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. यामुळे शहरातील नवीन रस्त्यांच्या कामाला ब्रेक लागला आहे. या योजनांच्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागो-जागी खड्डे झाली आहेत. एवढेच नव्हे तर मोठ्या वाहनामुळे धूळ उडत असून, नागरिकांना डोळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागातील रस्ते तरी बरे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहे.
सुरुवातीला अमृत योजनेच्या कामासाठी शहरातील गल्ली-बोळांमध्ये खड्डे खोदण्यात आले होते. पाइपलाइन टाकल्यानंतर या खड्ड्यांची थातूर-मातूर दुरुस्ती संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. परिणामी, मागील वर्षी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमध्ये वाहने अडकली. एवढेच नव्हे तर धुळीचे प्रमाणसुद्धा वाढले. काहींना तर रस्त्यांवरून खड्डा चुकवित असताना आपला जीव गमवावा लागला तर काहींना पाठीचे आजारसुद्धा जडले. पावसाळ्यात तर संपूर्ण रस्ते चिखलमय पहायला मिळाले. त्यामुळे शहरापेक्षा खेड्या-पाड्यातील रस्ते तरी बरे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे. आता काही भागांमध्ये दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असली तरी हे काम थातूर-मातूर पद्धतीनेच होत आहे. त्यामुळे खड्डे खोदल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.
सागर दुबे