जळगाव जिल्ह्यात सव्वादोन लाखांवर कुटुंब शौचालयाविना
By admin | Published: June 15, 2017 06:10 PM2017-06-15T18:10:15+5:302017-06-15T18:10:15+5:30
15 तालुक्यांपैकी फक्त एकच म्हणजेच भुसावळ तालुका हगणदरीमुक्त झाला.
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15 - जिल्हाभरात हगणदरीमुक्त ग्रा.पं.बाबत मागील दोन वर्षे मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करून व योजना राबवूनही समाधानकारक चित्र निर्माण झालेले नाही. 1151 पैकी फक्त 384 ग्रा.पं. हगणदरीमुक्त झाल्या आहेत. तर 15 तालुक्यांपैकी फक्त एकच म्हणजेच भुसावळ तालुका हगणदरीमुक्त झाला. इतर तालुक्यांमध्ये व्यक्तिगत लाभाची शौचालये निर्मितीबाबत धीम्या गतीने कार्यवाही सुरू आहे. जिल्हा हगणदरीमुक्तीसंबंधी राज्यात पिछाडीवर असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये असून, यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मिणा यांनी जि.प.त मार्च 2017 मध्ये झालेल्या आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
तीन वर्षापूर्वी जिल्हाभरात ग्रा.पं. अंतर्गत चार लाख 91 हजार 301 कुटुंबांकडे शौचालये नव्हती. मागील तीन वर्षे स्वच्छ भारत मिशन व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून अनुदान देऊन दोन लाख 78 हजार 18 एवढी व्यक्तीगत लाभाची शौचालये उभारली. मध्यंतरी साडेचार हजार रुपये अनुदान एका शौचालयासाठी दिले जायचे, आता हे अनुदान वाढवून 12 हजार रुपये केले असल्याची माहिती जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिली.
जिल्ह्यात 15 तालुके आहेत. दोन लाख 28 हजार 18 शौचालये बांधण्यासाठी तीन वर्षे कालावधी लागला आता उर्वरित दोन लाख 13 हजार 283 शौचालये या वर्षात म्हणजेच येत्या सहा महिन्यात पूर्ण करायचे आहेत. 2018 हे वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जि.प.ला दिले आहे, पण कामांची गती व अपूर्ण निधी लक्षात घेता हे आव्हान कसे पेलवेल, असा मुद्दा आहे. जिल्हाभरात 1151 ग्रा.पं. आहेत, पैकी फक्त 384 ग्रा.पं. हगणदरीमुक्त झाल्या आहेत, उर्वरित 767 ग्रा.पं. हगणदरीमुक्त कशा व केव्हा होतील, असा प्रश्न आहे.