मेहरुण तलाव परिसरात तरुणाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:59+5:302021-07-04T04:12:59+5:30
जळगाव : तांबापुरातील गौतम नगरातील रहिवासी गणेश रामदास अहिरे (वय ४०) या तरुणाने मेहरुण तलाव परिसरात कडूलिंबाच्या झाडाला दोरीने ...
जळगाव : तांबापुरातील गौतम नगरातील रहिवासी गणेश रामदास अहिरे (वय ४०) या तरुणाने मेहरुण तलाव परिसरात कडूलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. गणेश यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही, मात्र मयताचे पाय जमिनीला टेकले जात असल्याने या घटनेविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश अहिरे खासगी वाहनावर चालक म्हणून कामाला होते. शनिवारी रामदेववाडी (ता.जळगाव) येथे पैसे घ्यायला जायचे आहे, असे सांगून ते दुपारी शालकाकडून गेले. सायंकाळी पाच वाजता गणेश यांचे गळफास घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शालक प्रवीण चंद्रकांत वाघ याच्याही मोबाईलच्या व्हाटसॲप गृपवर हे फोटो आल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुनील सोनार व शुध्दोधन ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेश यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषीत केले.
दुपारी शालकसोबत गप्पा
गणेश हे दुपारी शालक प्रवीण वाघ याच्या घरी गेले होते. तेथे दोघं व इतर गप्पांमध्ये रंगल्या होत्या. हसतखेळत वातावरणात त्यांनी दीड वाजता घरातून पाय काढला. रामदेववाडी येथे पैसे घ्यायला जायचे आहे असे त्यांनी सांगितले. सायंकाळी मृतदेहच आढळला. अवघ्या तीन ते चार तासात असं नेमकं काय घडले की, गणेशला आत्महत्या करावी लागली. मयताचे पाय जमिनीला टेकलेले होते, त्यामुळे खरच आत्महत्या आहे की घातपात याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी झाडाखाली दारुची बाटली, आगपेटी व चप्पल आढळून आली. खिशात मोबाईल, पाकीट व चाव्या होत्या. गणेश नेमका कशाने रामदेववाडी गेला, की गेलाच नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही.मात्र पोलीस कारणाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मंगला व मुलगा चेतन असा परिवार आहे.