लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन, अधिकाऱ्यांनी धाड टाकली तर नवरीला सोडून पळाला नवरदेव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:56 IST2021-05-26T13:54:38+5:302021-05-26T13:56:09+5:30
नुकतीच तामिळनाडूच्या मदुरैमध्ये चार्टर्ड फ्लाइट बुक करून लग्न करण्यात आल्याचा घटना समोर आली होती.

लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन, अधिकाऱ्यांनी धाड टाकली तर नवरीला सोडून पळाला नवरदेव
कर्नाटकात कोरोना संक्रमणाच्या केसेस वाढत असून लॉकडाऊनमध्ये लोक नियमांचं उल्लंघन करून लग्नांचं आयोजन करत आहेत. नुकतीच तामिळनाडूच्या मदुरैमध्ये चार्टर्ड फ्लाइट बुक करून लग्न करण्यात आल्याचा घटना समोर आली होती. कर्नाटकातून लग्नासाठी लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
बंगळुरू मिररच्या रिपोर्टनुसार, राज्यात सध्या दोन लग्नावर छापे पाडण्यात आले. चिकमगलूर जिल्ह्यात जेव्हा अधिकाऱ्यांनी लग्नाच्या हॉलमध्ये धाड टाकली तेव्हा नवरदेव नवरीला सोडून पळाल्याची घटना घडली. मंगळवारी काडुर तालुक्यात आयोजित या लग्नात ३०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. दोन्ही परिवारावर आणि इतर १० लोकांवर गुन्हा दाखल करण्यत आला आहे. (हे पण वाचा : Video : एका लग्नाची भन्नाट गोष्ट! लग्नात सगळे नातेवाईक हवेत म्हणून पठ्ठ्यानं 'हवेत'च घातला लग्नाचा घाट)
तेच मांड्या जिल्ह्यातील बी होसुर गावात आणखी एका ठिकाणी धाड टाकण्यात आली. इथे ग्राम पंचायत सदस्याच्या मुलीचं लग्न सुरू होतं. हे लग्न रविवारी त्यांच्या घरी सुरू होतं. यावेळी ३०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. नियमानुसार, लग्नाच्या आयोजनासाठी तहसीदाराकडून परवानगी घ्यावी लागते. पण या ग्राम पंचायत सदस्याने परवानगी घेतली नाही. त्यानंतर लग्नातून चार कार ताब्यात घेण्यात आल्या आहेत. १० पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका ग्राम पंचायत अधिकाऱ्याने सांगितलं की, लग्न समारंभात ३० पेक्षा जास्त लोकांना सहभागी होण्याची परवानगी नाही. ते म्हणाले की, 'लोक अधिकाऱ्यांन मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते १० लोकांनी परवानगी घेतात आणि लग्नात २०० लोकांना बोलवतात'.