Kalyan: आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही, कारण....,  मनसेचे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 07:24 PM2024-08-01T19:24:25+5:302024-08-01T19:25:43+5:30

MNS MLA Raju Patil News: "मला तुम्हाला सत्तेत बसवायचे आहे" हे विधान राज ठाकरे यांनी केले असले तरी आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. सत्तेसाठी कोणाच्या तरी मागे जाणाऱ्यातील आम्ही नसून लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे अशा शब्दांत मनसे नेते आमदार राजू पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली.

Kalyan: We are not hungry for power, because..., MNS MLA Raju Patil's big statement | Kalyan: आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही, कारण....,  मनसेचे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान

Kalyan: आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही, कारण....,  मनसेचे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान

- मयुरी चव्हाण काकडे 
कल्याण  - राजकरणात एक सत्य आहे की तुम्ही जर सत्तेमध्ये नसाल तर आमदार होऊन काही फायदा नाही. म्हणून "मला तुम्हाला सत्तेत बसवायचे आहे" हे विधान राज ठाकरे यांनी केले असले तरी आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. सत्तेसाठी कोणाच्या तरी मागे जाणाऱ्यातील आम्ही नसून लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे अशा शब्दांत मनसे नेते आमदार राजू पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली.

कल्याण - शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी आणि पाणी हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे दोन प्रश्न आहेत. कल्याण शीळ रोडचे काम एमएसआरडीसी करत आहे, मेट्रोचे काम एमएमआरडीए करत आहे. जर मेट्रोचे काम सुरू होणार होते तर 30-40 कोटीचा चुराडा करून डिव्हायडर आणि लाईटचे पोल का उभे केले? हा पैसा कोणाच्या बापाचा आहे का ? पाण्यात बुडणाऱ्या स्मार्ट सिटी पार्कसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्याऐवजी इथल्या तळ्यांच्या संवर्धनासाठी हा निधी खर्च का केला नाही ? असे संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी नियोजनाच्या अभावामुळे घाईघाईत कामे केली असल्याची घणाघाती टिका आमदार पाटील यांनी केली. तसेच त्यांच्याकडे दूरदृष्टी नसून आम्ही पुढे टिकू की नाही टिकू, येऊ की नाही या भितीपोटी ओरबाडून घेऊन जाण्याची वृत्तीतून हे घडत असल्याचा गंभीर आरोपही आमदार पाटील यांनी केला. 

कल्याण डोंबिवलीतील प्रमूख पत्रकारांची संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुक, मनसेची भूमिका, मराठा आरक्षण, शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुती, मतदारसंघातील विकासकामे आदी विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना दिलखुलास तसेच परखडपणे उत्तरं दिली.

 मराठी माणूस टिकवण्यासह मुंबईची वाट लावण्यासही तत्कालीन शिवसेना जबाबदार...
शिवसेना सत्तेत येण्यापूर्वीची मुंबई आणि नंतरची मुंबई यामध्ये मोठा फरक आहे. पूर्वीची मुंबई सुटसुटीत होती. सत्ताधारी शिवसेनेनं 40 लाख मोफत घरांची योजना आणली. या योजनेचा उद्देश खूप चांगला होता. परंतु त्यावेळेस ही मानसिकता बनली की मुंबईत जा, फुटपाथवर एक झोपडी बांधा मग तुम्हाला मोफत घर मिळेल. या चुकीच्या धोरणामुळे हा सर्व बट्ट्याबोळ झाला असून त्याला मुंबई महापालिकेतील शिवसेनेचाही त्याला हातभार लावला. ज्याप्रमाणे त्यावेळी मुंबईतील मराठी माणूस त्यावेळी शिवसेनेमुळे टिकला तशी या मुंबईची वाट लावण्यासही शिवसेनाचा जबाबदार असल्याचे परखड मत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. 

 विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगुलपणा दाखवला तर स्वागतच आहे...
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघात आम्ही प्रामाणिकपणे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी काम केले आहे. त्याअनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपल्याला मदत करतील की नाही याबाबत आपण सांगू शकत नाही. परंतू एक गोष्ट नक्की आहे की ते आपल्यासमोर उभे राहिले आणि आपल्याला लोकांनी निवडून दिले तर मग त्यांची डबल नाचक्की होईल. त्यांचे राजकरण कसे चालते यावर नाही तर आम्ही आमच्या भरवशावर निवडणुका लढणार असून त्यांनी चांगुलपणा दाखवला तर त्यांचे स्वागतच आहे अशा शब्दांत आमदार पाटील यांनी यावेळी उत्तर दिले.

Web Title: Kalyan: We are not hungry for power, because..., MNS MLA Raju Patil's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.